पाकमध्ये महागाईने फारच बिकट स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहेत. विशेष म्हणजे ‘काळा स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्यापर्यंत मजल गेली. भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धूमधडाक्यात साजरा होत असताना व्याप्त काश्मीरसह पाकमध्ये निदर्शने अन् आंदोलन यासह जनतेचा सरकार अन् व्यवस्थेविरोधातील असंतोष रस्त्यांवर पाहायला मिळत होता.
भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनात एक दिवसाचे अंतर आहे. भारतात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम झाले. घरोघर तिरंगा फडकला. पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असताना त्या देशात मात्र नागरिक रस्त्यावर उतरले होते. वाढती महागाई, संपत आलेले परकीय चलन, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला देश यामुळे नागरिकांना आता मांस, मटण खरेदी करणे दुरापास्त झाले आहे. त्यातच भारताशी घेतलेला पंगा पाकिस्तानला चांगलाच महागात पडला असून भारतातून भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तू निर्यात होत नाहीत. गेल्या पाच वर्षांतील तिथल्या राज्यकर्त्यांनी भारताशी संबंध सुधारण्याचे काहीच प्रयत्न केले नाहीत.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक हिंसक निदर्शने झाली आहेत. या वर्षी 25 जुलै रोजी काश्मिरी राष्ट्रवादी पक्षांच्या एका गटाने रावळकोट जिल्ह्यात वीज कपात आणि अधिभाराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन सुरू केले. वीजबिलात बळजबरीने कर जोडले आहेत. त्याचप्रमाणे वीज कपातही वाढल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊनही त्याचा लाभ परिसरातील नागरिकांना मिळत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या चकमकीनंतर या निदर्शनांना हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि 20 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली. आंदोलकांच्या अटकेमुळे लोक संतप्त झाले आणि परिसरातील निषेधाची व्याप्ती आणखी वाढली.
वकील, व्यापारी, वाहतूकदार आणि मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षही यात सामील झाले. या संघर्षाचे खरे कारण पाकिस्तानशासित काश्मीरमध्ये जनतेत भविष्याची चिंता असल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे. किंबहुना, पाकव्याप्त काश्मीरवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तान सरकार राज्यघटनेत बदल करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. 2018 मध्ये पाकिस्तानने मुझफ्फराबादला आर्थिक आणि प्रशासकीय बाबतीत स्वायत्तता दिली. 2018 पूर्वी “आझाद जम्मू काश्मीर काउन्सिल’चाही या क्षेत्रात हस्तक्षेप होता. या परिषदेचे प्रमुख पाकिस्तानचे पंतप्रधान होते.
त्यावर कर संकलन, पर्यटन आणि नैसर्गिक संसाधनांसारख्या अनेक विभागांचे प्रशासकीय नियंत्रण होते. इथे राहणाऱ्या काश्मिरींचा असा विश्वास आहे की, पाकिस्तानला पुन्हा एकदा संविधानात सुधारणा करून बदल घडवून आणायच्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारी एक स्थानिक महिला म्हणते, 2019 मध्ये त्यांनी (भारताने) जम्मू आणि काश्मीरमध्ये जे केले, ते आमच्या बाबतीत घडले, तर आम्हाला पायदळी तुडवले जाईल, आमचे स्वतःचे काहीही राहणार नाही. 5 ऑगस्ट 2019 रोजी, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द केला आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले.
पाकिस्तान-प्रशासित काश्मीरचे माजी पंतप्रधान फारुख हैदर म्हणतात, “कदाचित भारत आणि पाकिस्तानने आपापसांत ठरवले असेल की तुमच्याकडे जे काही (भूभाग) आहे, ते तुमच्याकडे ठेवा, जे आमच्याकडे आहे, ते आमचेच राहील. हळूहळू ही नियंत्रण रेषा कायम होईल. आंतरराष्ट्रीय सीमा करण्यात यावी. हे कधीच होणार नाही. आम्हाला जे अधिकार दिले आहेत, ते परत करणे शक्य नाही.’ पाकव्याप्त काश्मीरला एक विशेष दर्जा आहे, जिथे स्थानिक सरकारच्या प्रमुखाला पंतप्रधान म्हटले जाते. पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या देशातील चार प्रांतांमध्ये त्याची गणना केली जात नाही. “पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’च्या नेतृत्वाखालील व्याप्त काश्मीर सरकारने अशा कोणत्याही हालचालीचा इन्कार केला आहे.
नियोजन, ऊर्जा आणि विकास मंत्री चौधरी अब्दुल रशीद यांनी विजेची समस्या सोडवली जात असल्याचा दावा केला असून, निदर्शनात अटक झालेल्यांना सोडण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरचा स्वतःचा ध्वज, राष्ट्रगीत, विधानसभा, अध्यक्ष, पंतप्रधान, उच्च न्यायालय, अगदी स्वतःचा निवडणूक आयोग आणि कर संकलन प्रणाली आहे; परंतु राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या ते पाकिस्तानशी जोडलेले आहे. भारतातही जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असताना प्रारंभी पाकव्याप्त काश्मीरसारखे विशेषाधिकार होते. गेल्या 75 वर्षांत काश्मीरचे बरेच विशेषाधिकार कमी करण्यात आले आणि आता तर विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यामुळे कोणतेही विशेषाधिकार राहिलेले नाहीत. इकडे भारतात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला असताना पाकिस्तानचा 75 वा स्वातंत्र्य दिन “काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. कारण लोक, राजकीय कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी सरकारविरोधात असंतोष दर्शवला. उत्तर आणि दक्षिण वझिरिस्तानमधील लोक दीर्घकाळापासून दहशतवादाच्या गर्तेत जळत आहेत.
तालिबान आणि “इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक’ (इसिस) यांसारख्या भयंकर दहशतवादी संघटनांच्या उपस्थितीमुळे त्यांचे जीवन दयनीय झाले आहे आणि पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सामान्य नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्या आहेत. देशभरात विरोधी पक्षांकडून सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत. जागतिक नाणेनिधीकडून सात अब्ज बिलियन कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान गरिबांच्या पोटावर हात मारणार असे चित्र आहे.
“तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (टीएलपी) ने नजरिया पाकिस्तान कॉन्फरन्स या नावाने लियाकत बाग ते फैजाबाद रावळपिंडी अशी रॅली काढली. “तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने सरकारविरोधी परिषद आयोजित केली होती. लियाकत बाग ते फैजाबाद इंटरचेंजपर्यंत नाझरिया पाकिस्तान मार्च आणि कॉन्फरन्स आयोजित केली होती. यासाठी “टीएलपी’ कार्यकर्त्यांनी रावळपिंडीतील फैजाबाद आणि मुरी रोड ब्लॉक केला. दोन्ही बाजूंनी निघालेल्या मिरवणुकांमुळे लाहोर आणि इतर शहरांमध्ये दिवसभर रस्ते ठप्प होते. वाहतूक वळवण्यात आल्याने लोक तासन्तास ट्रफिक जॅममध्ये अडकले होते. इम्रान खान यांनी लाहोरमध्ये 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आणि वास्तविक स्वातंत्र्यावर जोर देण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची टीका केली आणि त्यांच्यावर अमेरिकेची गुलामगिरी केल्याचा आरोप केला; मात्र त्याचवेळी इम्रान खान यांनी आपण अमेरिकाविरोधी नसल्याचे स्पष्ट केले. त्यांना अमेरिकेशी मैत्री हवी आहे.
यापूर्वी इम्रान खान यांनी अमेरिकेवर आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. काही लोक “पीटीआय’ आणि लष्कर यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे पूर्व बंगालमधील सर्वांत मोठा पक्ष आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्षाची परिणती ढाक्याच्या पतनात झाली हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर हेराफेरीचा आरोप केला आहे. स्वातंत्र्यदिनी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या एकता आणि विकासावर बोलण्याऐवजी पुन्हा एकदा संस्थांवर आपल्या विरोधात षड्यंत्र रचल्याची टीका केली.
पाकिस्तानच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर पंजाबमधील पोटनिवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप त्यांनी केला. “तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “पाकिस्तान आयडॉलॉजी मार्च आणि कॉन्फरन्स’ आयोजित केली होती. फैजाबाद इंटरचेंज येथे रॅलीला संबोधित करण्यापूर्वी, “टीएलपी’ प्रमुखाने इस्लामाबादचे जुळे शहर रावळपिंडी येथील लियाकत बाग येथून मिरवणुकीचे नेतृत्व केले. मोठ्या संख्येने “टीएलपी’ कार्यकर्ते आणि समर्थक बॅनर, फलक आणि “टीएलपी’ झेंडे घेऊन रॅली आणि मिरवणुकीत सहभागी झाले होते. “तेहरीक-ए-लब्बेक पाकिस्तान’ प्रमुख साद हुसेन रिझवी यांनी म्हटलं आहे की काही घटक केवळ राजकीय स्वार्थासाठी देशाला मूर्ख बनवत आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील काही राजकीय पक्षांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्थानिक काश्मिरींनी जबरदस्तीने हा कार्यक्रम थांबवला आणि आझादीचा नारा दिला. एकंदरितच धार्मिक आधारावर स्थापन झालेल्या देशाचे दोन तुकडे होऊनही अजूनही स्वातंत्र्याला काळे स्वातंत्र्य म्हणण्याची वेळ सामान्यांवर येत असेल, तर त्याचा दोष तेथील राज्यकर्त्यांनी नाकारून कसे चालेल?
– आरिफ शेख