काही दिवसांपूर्वी माझा ‘पश्चिमेनं काय दिलं’ हा लेख प्रसिद्ध झाला. अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. अपेक्षेप्रमाणे काहींनी लेख नीट न वाचता मी पूर्वेकडील देशांनी (विशेषत: भारतानं) काहीच योगदान दिलं नाही, असा अर्थ काढला आणि टीका केली. वास्तविक आपल्याकडील संशोधन आणि अभ्यास यात सुसूत्रता नसल्यानं आणि त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड न ठेवल्यानं वादग्रस्त ठरतात, असं लिहिलं होतं.
काही विद्वानांनी वराहमिहिर, आर्यभट्ट इत्यादीचे दाखले देऊन मला अधिक अभ्यास करायची सूचना केली. त्यावर मला असं सांगायचं आहे की, आपल्याकडील ज्ञानाचा जमेल तितका खोलवर अभ्यास करून तो लोकांपुढे आणण्याचा माझा कायम प्रयत्न असतो.
यामुळेच श्रीनिवास रामानुजन यांच्यावर आपल्याच लोकांनी कसा अन्याय केला, हे दाखवणारं “डेथ ऑफ अ मॅड मॅथेमॅटिशियन’ हे नाटक लिहिलं. त्याच्या प्रयोगांचं कौतुक करणारं परीक्षणही मुख्य वृत्तपत्रांनी केलं. त्याचं मराठी रूपांतरही आकाशवाणीनं 8 भागांत प्रसारित केलं हे सगळं काय दर्शवतं? मी सध्या ब्रह्मगुप्तानं शून्याची आणि दशमानपद्धतीची जी देणगी जगाला दिली त्यावर नाटक लिहीत आहे. त्या संदर्भात ब्रह्मगुप्ताच्या “ब्राह्मस्फुटसिद्धांता’मधील या शोधांवरच्या सूत्रांचं भाषांतर मला हवं होतं तेव्हा अशा बहुतांश “विद्वानांनी’ असमर्थता दर्शविली. काहींना तर हे शोध ब्रह्मगुप्तानं लावले याचाच पत्ता नव्हता! आता बोला.
आज आपण पूर्वेनं जगाला काय दिलं यावर बोलू या. “जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटातील एका गाण्यात “ये पूरब है ये पूरबवाले हर जान की कीमत जानते हैं’ अशी ओळ आहे. त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता अर्थात काळ बदलला आहे! प्राचीन पौर्वात्यांनी तत्त्वज्ञानाची ग्रीकांइतकीच बहुमोल भेट जगाला दिली आहे. भारतानं हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी तत्त्वज्ञानांची पोतडीच दिली आहे, तर चीननं लाओ त्से आणि कुंग फु त्से (कन्फ्यूशियस) यांचं तत्त्वज्ञान जगाला अर्पण केलं आहे.
वेद आणि इतर प्राचीन वाङ्मय हीसुद्धा फार मोठी देणगी आहे. प्राचीन भारताची आणखी एक महत्त्वाची भेट म्हणजे योग, की ज्याचा आज जगभर प्रसार झाला आहे आणि असंख्य लोक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा लाभ घेत आहेत. वर सांगितल्याप्रमाणे शून्य आणि दशमानपद्धती भारतानंच जगाला दिली आहेत.एवढंच नव्हे तर अंक आणि गणिताच्या महत्त्वाच्या पद्धती याही ब्रह्मगुप्तानंच जगाला दिल्या आहेत. लक्षात घ्या, शून्याची संकल्पना नसती तर आजचा संगणकही शक्य झाला नसता, कारण संगणकीय भाषा ही एक आणि शून्य यांच्यावर आधारित आहे.
चीन, जपान आणि कोरिया या देशांनी कुंग फू, जु-जुत्सु यांसारख्या युद्धकला जगाला दिल्या आहेत. भारतीय, चिनी, जपानी भाषांनी जागतिक वाङ्मय खूप समृद्ध केलं आहे. चीननं तर अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा शोध लावला आहे. शोभेची आणि सुरुंगाची दारू, कागद, छपाई इत्यादी मनुष्यजातीला पुढं नेणारे शोध चिन्यांनी लावले. पौर्वात्यांनी आपल्या नवनिर्मितीचा प्रसार आणि विकास न केल्यानं पाश्चिमात्य देशांनी आघाडी घेतली.
आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर कालचक्र पुन्हा फिरून पारडं पूर्वेच्या दिशेनं झुकताना दिसत आहे. चीन तर अमेरिकेपेक्षाही बलवान होऊन महासत्ता होण्याची चिन्हं दिसत आहे. एकेकाळचा हा गरीब देश सर्वात श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे. भारतही त्याच दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. चीन सर्व जगाचं उत्पादन केंद्र बनला आहे तर भारत संगणकीय ज्ञानात अग्रेसर आहे. भारत संगणक क्षेत्रात अवघ्या जगाला आधार देत आहे. इलेक्ट्रॉनिक आणि इतर उत्पादनांमध्ये एकेकाळी खूप पुढे असलेल्या इंग्लंड, अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांना आज तीच उत्पादनं जपान आणि कोरिया निर्यात करताना दिसताहेत.
कलेच्या क्षेत्रातही पूर्व पश्चिमेला पुरून उरताना दिसतो. चित्रपट असोत किंवा संगीत असो; साहित्य असो वा चित्रकला असो या सगळ्यात पाश्चिमात्यांना दखल घ्यायला पूर्वेकडच्या देशांनी भाग पाडलं आहे. एके काळी ज्या देशांवर पाश्चिमात्यांनी सत्ता गाजवली त्या देशांचं नेतृत्वही पूर्वेकडील लोक करू लागले आहेत. यापेक्षा पूर्वेच्या कर्तृत्वाचं वेगळं उदाहरण ते काय असू शकतं?
– श्रीनिवास शारंगपाणी