मुंबई :- कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “ज्वलंत प्रश्नावरून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी भाजपनेच रचलेला हा कट असल्याचे सामान्य नागरिकांचे मत झाल्याचा” आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी संभाजी भिडे यांचं नाव न घेता यासंदर्भात फेसबूकवर Post करत आपली संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटलेे आहे की, “राज्यातील एक व्यक्ती कित्येक दिवसांपासून सुरवातीला महिला भगिनींबाबत, त्यानंतर महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याबाबत आणि आता जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांविषयी उघडपणे गरळ ओकत असताना सरकार मात्र काहीही कारवाई करत नाही.
उलट या दुष्प्रवृत्तीला रोखण्याऐवजी एक भाजप खासदार उघडपणे त्यांची बाजू घेतो… यावरून आजच्या ज्वलंत प्रश्नावरून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी भाजपनेच रचलेला हा कट असल्याचं सामान्य लोकांचं मत आहे. पण हे असंच चालू राहिलं आणि लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.