औरंगाबाद – नवरात्र आणि दसऱ्याचा सण संपत नाही, तोच औरंगाबादची ग्राम देवता असलेल्या कर्णपुरा देवीच्या परिसरातील बालाजी मंदिरातील दानपेट्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या धाडसी चोरीमुळे मंदिर परिसरातील पुजारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजेच्या सुमारास कर्णपुरा बालाजी मंदिराच्या जवळ राहणारे अनिल पुजारी यांना जाग आली. मंदिराचे शटर कुणीतरी उघडत असल्याचा आवाज येत होता. तसेच घराबाहेर काही लोक असल्याचे जाणवताच त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे रहिवासीदेखील जागे झाले. सर्वांनी मंदिराकडे धाव घेतली असता मंदिराच्या समोरील चॅनल गेटचे कुलूपही तोडलेले होते. तर पाठीमागील दुसरा दरवाजादेखील उघडा होता.
या घटनेत बालाजी मंदिरातील 30 ते 35 किलो वजनाची दानपेटी आणि एक लहान दानपेटी अशा दोन दानपेट्या चोरीला गेलेल्या आढळून आले. तसेच बालाजी मंदिरासमोरील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.
पूजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना देताच छावणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शिवाय फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानपथकही दाखल झाले होते. मात्र पाऊस पडल्याने श्वान पथकाची मदत घेता आली नाही. मंदिराचे पूजारी यांच्या फिर्यादीवरून दुपारपर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.