मुंबई : गैरप्रकारात दोषी आढळलेल्या राज्यातील 347 रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विधानसभेत दिली. मौजे अकोली जहागीर (ता.अकोट, जि.अकोला) येथील एका रास्त भाव दुकानाच्या अनुषंगाने सदस्य रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देताना कदम बोलत होते.
मौजे अकोली जहागीर येथील रास्त भाव दुकानातून अवैध धान्यसाठा आढळून आल्यामुळे कारवाई करुन तो जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकानदाराचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाब न्याय प्रविष्ट आहे. चौकशीनंतर कठोर कारवाई करण्यात येईल. गैरव्यवहार केल्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दुकानांवर प्रथम परवाने निलंबित करण्याची आणि नंतर कायमचे रद्द करण्याची कारवाई केली जाते, अशी माहितीदेखील कदम यांनी यावेळी दिली.