मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड, आतडं या शरीरांतर्गत अवयवांचं तंत्र बिघडतंच. पण मधुमेहाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो डोळ्यांवर. मधुमेह जसा वाढतो, कमी होतो तसा तो दृष्टीवर परिणाम करतो. कधी कधी चष्म्याचा नंबर अचानक वाढतो. तर कधी कधी रुग्णात काचबिंदूचाही त्रास होतो. मुख्य म्हणजे मधुमेह असणा-या व्यक्तींनी डोळ्यांची काळजी वेळेत न घेतल्यास कायमचं अंधत्वही येऊ शकतो.
नियंत्रणात नसलेल्या मधुमेहात शरीरपेशींमधली ऑक्सिजन वाहण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ऑक्सिजन उतींपर्यंत पोहोचू शकत नाही. शुगर जर खूप जास्त दिवस वर राहिली तर कोणत्याही अवयवात, अवयवांच्या आसपास असणा-या रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात. रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत झाल्यामुळे त्यातून रक्त वाहू लागतं. काही ठिकाणी रक्तवाहिन्यांच्या भिंतीचं आवरण जाड होतं. या जाड आवरणामुळे ऑक्सिजन आणि प्रथिनं शरीर पेशींपर्यंत पोहोचू शकत नाहीत. या सगळ्याचे अनिष्ट परिणाम शरीरांतर्गत अवयवांवर होतात.
आता डोळ्यांवर होणारा परिणाम म्हणजे डोळय़ांतील दृष्टिपटलाला (रेटिना) होणारा त्रास. या दृष्टिपटलावर आपण बघत असलेल्या वस्तूंची माणसांची चित्र तयार होतात. मात्र मधुमेहात दृष्टिपटलापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे या पटलाचे काही भाग निकामी होता. दृष्टिपटलावर नवीन रक्तवाहिन्या तयार होतात. त्या नवीन रक्तवाहिन्या या आधी असणा-या रक्तवाहिन्यांपेक्षा खूपच नाजूक असतात. नव्या तयार झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे दृष्टिपटल जरा जास्तच कमजोर होतं. त्याचा परिणाम व्यक्तीच्या बघण्याच्या क्षमतेवर होतो.
मधुमेह झालेल्या प्रत्येकाच्याच दृष्टिपटलाची बघण्याची एका झटक्यात क्षमता कमी होत नाही. हा परिणाम हळूहळू होतो. त्यामुळेच मधुमेहाचा त्रास असणा-या प्रत्येकानेच वर्षातून एकदा तरी डोळ्यांची खासकरून दृष्टिपटलाची तपासणी करावी. कारण कधी कधी जास्तीच्या वाढलेल्या आणि नाजूक रक्तवाहिन्यांतून डोळय़ांत रक्तस्त्राव होतो. या आजाराला ‘रेटिनोपथी’ किंवा ‘डायबेटिक रेटिनोपथी’ म्हणतात. या रक्तस्रावामुळे डोळा निकामी होऊ शकतो. कधी कधी डोळय़ांच्या मागच्या भागावर जशा जास्तीच्या रक्तवाहिन्या निर्माण होतात तशा त्या डोळय़ांच्या पुढच्या भागावरही तयार होतात. अशा रक्तवाहिन्या जर तयार झाल्या तर त्यांतून ‘ग्लॉकोमा’ म्हणजे ‘काचबिंदू’चा त्रास होतो.
‘रेटिनोपथी’ किंवा ‘डायबेटिक रेटिनोपथी’मध्ये अॅप्थॅल्मोस्कोपी करून दृष्टिपटल तपासावं लागतं. या तपासणीत काही दोष आढळल्यास फ्लोरोसंट अँजिओग्राफी करावी लागते. बहुतेकांना फक्त हृदयाचीच अँजिओग्राफी करतात एवढंच काय ते माहीत आहे. पण डोळय़ांचीही अँजिओग्राफी केली जाते. या तपासणीत कुठल्या रक्तवाहिनीतून रक्त वाहतंय, किंवा रक्तवाहिनी कुठे चोकअप, कुठे गळत आहे ते कळतं. त्याप्रमाणे आम्हाला ड्रॉप्स, इंजेक्शनच्या मध्यमातून औषधोपचार करणं सोपं जातं. कधी कधी मधुमेह असणा-यांच्या डोळय़ाच्या दृष्टिपटलातील काही भाग जाड होतो. तर कधी पातळ. मात्र हा प्रकार पुढे भविष्यात धोकादायक ठरू शकतो हे मधुमेहाचा त्रास असणा-या रुग्णांना कळत नाही. त्याच्यासाठी ओसीटी नावाची चाचणी करावी लागते. यात डोळय़ांची ऑप्थेल्मिक सोनोग्राफी केली जाते. यात दृष्टिपटल किती बारीक झालं आहे, हे त्यातून कळतं. डायबेटिक रेटिनोपथीसाठी तीन चाचण्या आहेत. आधी साधी अॅप्थॅल्मोस्कोपी. नंतर अँजिओग्राफी. मग ओसीटी चाचणी.
मधुमेह असलेल्या प्रत्येक रुग्णाला काचबिंदू होतो, असा सर्वसामान्य लोकांचा समज आहे. पण शुगरची पातळी सतत वर खाली होणा-या रुग्णांमध्ये काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. आमच्याकडे बरेच मधुमेही रुग्ण येतात. ‘या आधी तुम्ही डोळय़ांची तपासणी केली आहे का,’ असं विचारल्यावर ‘हो, चष्म्याचा नंबर काढलाय’, असं उत्तर मिळतं. म्हणजेच डोळय़ांची तपासणी म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर हेच समीकरण आजही लोकांच्या डोक्यात पक्कं आहे. पण असं व्हायला नको. मधुमेही रुग्णांनी वर्षातून एकदा तरी डोळय़ांची तपासणी आवर्जून केली पाहिजे. मधुमेहाचा त्रास असणा-या गरोदर स्त्रियांनीही पहिल्या तीन महिन्यात दृष्टिपटलाची तपासणी करावी. दृष्टिपटलाची तपासणी, डोळय़ांचं प्रेशर मोजणं, काचबिंदू आहे का ते तपासणं, डोळय़ांच्या नसांची तपासणी करणं या चाचण्या नियमित केल्यास पुढची गुंतागुंत टाळता येते.