कराड -लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे जनतेत असंतोष आहे. याबाबत सर्वत्र तक्रारी होत असल्याने त्याची दखल घेत खा. श्रीनिवास पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वीज बिलासंदर्भात आलेल्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करा, अशी सूचना त्यांनी वीज अभियंत्यांना दिल्या.
करोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांना जून महिन्यात वीज बिले अदा केली आहेत. मात्र, वाढीव वीज बिल आल्यामुळे जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे वीज बिल भरताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर वाढीव बिल दुरूस्त करून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
खा. श्रीनिवास पाटील यांनी नागरिकांच्या वाढलेल्या तक्रारींची व त्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची गांभिर्याने दखल घ्यावी, अशी सूचना केली. ज्या ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये खरोखरच चूक आहे, त्यांच्या तक्रारीचे त्वरीत निवारण करावे. वीज बिल आकारणी प्रक्रिया मोठी किचकट असते.
ती प्रक्रिया सामान्य ग्राहकाला समजावून सांगण्यासाठी ग्राहक संपर्क अभियान सुरू करावे अशा सूचना देखील यावेळी खा. पाटील यांनी केल्या. यावेळी सारंग पाटील, अभियंता नवाळे, अमित आदमाने, जालिंदर कुंभार, स्वप्नील जाधव, सचिन माळी, अमोल साठे उपस्थित होते.