मुंबई: मे महिन्याच्या प्रारंभापासून देशात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे. आता जून किंवा जुलैमध्ये या साथीची परमोच्च अवस्था निर्माण झालेली असेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात या साथीच्या विरोधात सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली असेल. असे सफदरजंग रुग्णालयातील वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. बलविंदर अरोरा यांनी म्हटले आहे.
करोना विषाणू स्वतःच सामुदायिक प्रतिकारक्षमता निर्माण करत आहे. त्यासाठी आवश्यक असलेली परमोच्च अवस्था लवकरच निर्माण होईल. त्याच्या आधारावर सामुदायिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली आपल्याला ऑगस्ट महिन्यात पहायला मिळेल. सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यावर या विषाणूच्या संसर्ग होऊ शकणारे ज्येष्ठ नागरिक, आजारी आणि संभाव्य रुग्णही सुरक्षित होतील, असे डॉ. अरोरा यांनी म्हटले आहे.
करोना विषाणूमध्ये बदल घडून येत आहेत. हा विषाणू कोणत्याही एका भागात केंद्रीत झालेला नाही. उलट हा विषाणू देशात सर्वत्रच पसरलेला आहे. गेल्या 24 तासात देशभरात सर्वाधिक म्हणजे 5,242 रुग्ण वाढले आहेत. आता देशातील संसर्गाच्या परमोच्च अवस्थेच्या दिशेनेच ही वाटचाल सुरू आहे. आता नागरिकांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट आणि कठोर करायला हवी. एका ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येता कामा नये. हे सोशल डिस्टन्सिंग राखले गेले तरच प्रादुर्भावावर नियंत्रण राखले जाऊ शकेल, असेही डॉ. अरोरा म्हणाले.
करोना विषाणूत स्थित्यंतर घडत असल्याचे अनेक वैज्ञानिकांनी म्हटले आहे. मात्र या स्थित्यंतरामुळे त्याचा प्रादुर्भाव किती कमी होईल किंवा वाढेल, त्याची तीव्रता, संसर्ग क्षमता आणि आयुर्मान यावर काय परिणाम होईल, हे अद्याप कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही. सध्या तरी या विषाणूवर कोणतेच औषध उपलब्ध नसल्याने खबरदारी हाच उपाय असल्याचे डॉ. अरोरा यांनी जोर देऊन सांगितले.