मुंबई – जागतिक पातळीवर वाढलेले व्याजदर, खनिज तेलाच्या वाढत असलेल्या किमती, भारतात अजूनही उच्च पातळीवर असलेली महागाई इत्यादी विषयाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार आहे.
एकूण परिस्थितीचा विचार केला तर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात बदल करण्याची शक्यता कमी आहे. या अगोदरच्या पतधोरणातही रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात बदल केला नव्हता. मात्र अप्रत्यक्ष उपायोजनाद्वारे भांडवल सुलभता कमी केली होती. पतधोरण समितीची बैठक 4 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. 6 ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी रिझर्व्ह बॅंकेच्या वेबसाईटवर पतधोरण समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती जाहीर केली जाणार आहे.
सध्या रिझर्व्ह बॅंकेचा मुख्य व्याजदर म्हणजे रेपो दर 6.5% आहे. हा अगोदरच उच्च पातळीवर आहे. यात आणखी वाढ केल्यानंतर त्याचा भांडवलाच्या वापरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्राकडून व्याजदर कमी करावेत अशी मागणी होत आहे. मात्र महागाई जास्त पातळीवर असल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करू शकत नाही.
महागाई कमी करण्यासाठी मे 2022 पासून रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात विविध टप्प्यात तब्बल अडीच टक्क्याची वाढ केली आहे. प्रथमच रिझर्व्ह बॅंकेने इतका प्रदीर्घकाळ व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.5% आहे. या दराच्या आधारावर व्यावसायिक बॅंका वैयक्तिक आणि इतर कर्जाचे व्याजदर ठरवितात.
त्यामुळे सध्या भारतातील वैयक्तिक कर्जावरील व्याजदर उच्च पातळीवर आहेत. विशेषत: घर घेतलेल्यांना व्याजदरापोटीे अधिक हप्ता द्यावा लागत आहे. बॅंक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की, व्याजदरात फेरफार करण्यास कमी वाव आहे. किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 6.8% आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हा दर कमी होण्याची शक्यता आहे.
तो दर कमी झाला तर त्यानंतरच्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंक मवाळ भूमिका घेऊ शकते. विषम पर्जन्यमानामुळे अन्नधान्याच्या खरिपातील उत्पादनाच्या आकडेवारीबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. गहू, तांदळाच्या किमती उच्च पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत व्याजदर कमी करण्याच्या शक्यतेवर रिझर्व्ह बॅंक विचार करू शकणार नाही.
भांडवल सुलभतेची गरज
रिऍल्टी क्षेत्रातील काही विकसकांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने या अगोदरच्या पतधोरणात भांडवल सुलभता कमी केली होती. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या व्यासदरात पाव टक्क्याची वाढ झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात भारतात बरेच सण येतात. या काळात ग्राहक खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. अशा अवस्थेत रिझर्व्ह बॅंकेने भांडवल सुलभतेत वाढ करण्याची गरज आहे, असे मत नारडेको या संस्थेचे अध्यक्ष राजन बांदलेकर यांनी व्यक्त केले.