नागपूर – राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. जालन्यातील घटनेनंतर राज्यभरात आंदोलने केली जात आहे. यानंतर आता आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. “लोकांच्या मनातील भेदभाव संपेपर्यंत आरक्षण टिकायला हवे,” असे विधान डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी नागपुरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आयोजित एका कार्यक्रमात केले आहे.
मोहन भागवत म्हणाले की, “आपल्या देशात दिलेल्या आरक्षणाला सामाजिक विषमतेचा इतिहास आहे. सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण आपल्या बांधवांना मागे टाकलं आहे. आपण त्यांची काळजी घेतली नाही आणि 2000 वर्षांपर्यंत सुरू राहिलं. जोपर्यंत आपण त्यांना समानतेनं वागवत नाही, तोपर्यंत काही विशेष गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि त्यापैकीच एक आरक्षण आहे. त्यामुळेच जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम असायला हवं. समाजात भेदभाव अस्तित्वात असेपर्यंत आरएसएसचा संविधानात दिलेल्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे.”
पुढे ते म्हणाले, “भेदभाव दिसत नसला तरी समाजात तो प्रचलित आहे. आरक्षणाचा विषय तर्काच्या आधारावर आपण कधीच समजू शकणार नाही. हा तर्काचा विषय नसून, समानता मानण्याचा विषय आहे. आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांच्या गरजा पूर्ण झाल्याने त्यांनी आरक्षण सोडून देण्याबाबतही आवाज उठतो. मात्र, सामाजिक समानता आल्याशिवाय काहीही शक्य नाही. त्यामुळे आरक्षण कधीपर्यंत राहील, असा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांनी हा विचार करावा की, काही लोकांनी दोन हजार वर्षे अन्याय, त्रास सहन केला, मग आम्ही दोनशे वर्षे कष्ट भोगले तर काय होणार आहे?, ” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अखंड भारत’ कधी होणार?
‘अखंड भारत’ कधी होईल, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने यावेळी सरसंघचालकांना केला. यावर डॉ. भागवत म्हणाले, “अखंड भारत म्हणजे सीमा बदलणे नव्हे, तर भारतीय मानसिकता स्वीकारणे होय. देशाची फाळणी झाली, कारण त्यांची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी होती. भारताचे सध्याचे चित्र पाहून शेजारील अनेकांना आता तसे वाटत आहे. त्यांनी एकदा का आमची विचारसरणी स्वीकारली, की ज्यात कट्टरतेचा समावेश नसेल, त्यावेळी अखंड भारताची निर्मिती होईल,” असे सरसंघचालक म्हणाले.
…तर आरक्षण का रद्द केलं जात नाही?
देशातील वंचित समाजातील द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाली. मग आरक्षणाची गरज काय? आरक्षण का रद्द केलं जात नाही? या प्रश्नावर बोलताना सरसंघचालक म्हणाले की, “आपल्या देशात सामाजिक विषमतेचा इतिहास लक्षात घेऊन आरक्षण दिलं गेलं आहे. ज्यांनी भेदभाव केला. आमच्यासोबत राहिले, त्यांना मागे ठेवलं, त्यांचे आयुष्य जनावरांसारखं असूनही आपण काळजी केली नाही आणि हे असंच दोन हजार वर्षे चालले. त्यामुळे त्यांना बरोबरीत आणेपर्यंत आरक्षणासारखे उपाय करणं आवश्यक आहे.”