नवी दिल्ली – भारतात गेल्या 15 वर्षांत 41.5 कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झाली आहे. 2005-06 ते 2019-21 या वर्षांमध्ये देशातील गरिबीमध्ये मोठी घट झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या “मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक बदल असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
2030 पर्यंत दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलांचे प्रमाण निम्म्याहून अधिक कमी करण्याचे लक्ष्य शक्य असल्याचे संयुक्त राष्ट्राने या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड दारिद्रय आणि मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतातील दारिद्रय निर्मुलनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे.
जागतिक भूक निर्देशांकात इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घसरण झाल्याचं समोर आल्यानंतर सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यातच देशातील गरिबीत घट होत असल्याचा अहवाल पुढे आल्यानंतर सरकारला दिलासा मिळाला आहे.