जालना – जालना जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा रोडवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात भरधाव आयशर आणि ऍपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झाल्याने घडला.
परवीन बी राजू शहा (वय 25), आलिया राजू शहा (7), मुस्कान राजू शहा (3), कैफ अशपाक शहा (19) आणि मनीषा तिरुखे (26) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात जालन्यातील जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ झाला. अपघातातील सर्व मयत हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असून पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की आयशरच्या धडकेत रिक्षाचे अवशेष तुटून सर्वत्र विखुरले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.