पुणे -केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले. मात्र, त्यांना सहकाराची एबीसीडीच माहिती नाही. कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा.
केंद्र सरकारने मंत्री बदलले, मात्र गाडीचे डबे बदलून उपयोग नसून इंजिनच खराब झाले आहे, अशी भाजपवर बोचरी टीका कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली.
आमच्या महाविकास आघाडी सरकारची गाडी चांगली आणि ड्रायव्हरही चांगला आहे, असेही ते म्हणाले. पुण्यातील कॉंग्रेस भवन या ठिकाणी नाना पटोले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळीसहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी तसेच आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, भाजपाची संस्कृतीच खोटे बोलण्याची आहे. मोदी सत्तेवर आले ते खोटे बोलूनच. दोन दिवसांपूर्वी विधानसभेत घडलेल्या प्रकारामध्ये विरोधक शिव्यांसाठी माफी मागतात, तर दुसरीकडे आम्ही शिव्या दिल्याच नाही असे म्हणतात.
त्यावरून विरोधी पक्षनेते खोटे बोलतात, हे नक्की. मुळात आधीपासूनच ते देशातील अनेक व्यवस्था ते उध्वस्त करत आहेत. आता मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार.
इंजिनचा प्रॉब्लेम हा कॉंग्रेस पक्षाला
नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य कॉंग्रेसबद्दल होते का? इंजिनचा प्रॉब्लेम हा कॉंग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही आहे.