दुबई – करोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांत ओमानमधून सुमारे 50 हजार भारतीयांना मायदेशी परत धाडण्यात आले आहे. या भारतीयांना परत आणण्यासाठी विविध खासगी कंपन्या, सामाजिक संस्था आदींनी 198 चार्टर्ड फ्लाईट्सची सोय केली होती. त्यातून 35 हजार भारतीयांना परत आणण्यात आले. वंदेभारत मिशनमधून 17 हजार भारतीयांना परत आणण्यात आले आहे.
भारतीय दूतावासातील अधिकारी अनुज स्वरूप यांनी सांगितले की, ओमानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत नेण्यासाठी 9 मे पासून वंदेभारत मिशन अंतर्गत विमांनांची सोय करण्यात आली असून ही विमाने अजूनही सुरूच आहेत.
वंदेभारत मिशनचा पाचवा टप्पा लवकरच सुरू होत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भारतीय नागरिकांच्या मागणी व सोयीप्रमाणे येथील विमानांचे आयोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
ओमानमध्ये सुमारे 80 हजार लोकांना करोनाची बाधा झाली आहे. करोनामुळे येथे जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्यामुळे अनेक भारतीयांना नोकऱ्या सोडून मायदेशी परत जावे लागत आहे.
आखाती देशात सुमारे 90 लाख भारतीय काम करीत होते. त्यातील बराच वाटा ओमान देशाचाही होता. ओमानमध्ये एकूण 7 लाख 70 हजार नागरिक काम करीत होते. यापैकीही अनेक नागरिकांना अद्याप भारतात जायचे आहे.