पिंपरी -करोना काळामध्ये कुटुंबातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून त्या कुटुंबास 50 हजारांची मदत केली जाते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून 6 हजारांपेक्षा अधिक अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यातील 647 अर्जांत त्रुटी असल्याने ते अर्ज नाकारण्यात आले होते. त्यांना पुन्हा संधी देण्यात आली असून त्या अर्जातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
करोनामुळे शहरात आतापर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 488 जण बाधित झाले होते. तर, 4 हजार 620 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहराबाहेरील नागरिक परंतु शहरात उपचार घेत असताना मृत्यू झालेल्यांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे शहरातून सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक अर्ज पाठविण्यात आले होते. हे अर्ज ऑनलाइन माध्यमातून राज्य शासनाच्या पोर्टलवर स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते.
अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये झालेल्या चुका व आधार कार्ड क्रमांक चुकल्याने, करोना मृत्यूचे प्रमाणपत्र नसणे, मृत्यूचे कारण नोंदविलेले नसणे, तसेच, आवश्यक कागदपत्रे न जोडल्याने अर्ज रोखून ठेवण्यात आले आहेत. त्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी पालिकेच्या वतीने विशेष शिबिर पिंपरी कॅम्पातील जिजामाता रूग्णालयात घेण्यात आले.
संबंधित अर्जदारांना बोलावून अर्जासंदर्भातील न दिलेली आवश्यक कागदपत्रे तडताळून घेण्यात आली. अर्जाची त्रुटी भरून काढून ते अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ऑनलाइन सादर करण्यात आले. पात्र अर्जदारांच्या बॅंक खात्यात 50 हजारांची रक्कम जमा केली जात आहे. शिबिरानंतरही शहरातील अर्जदारांच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेकडून सहाय केले जाणार असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.