पिंपरी – महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नदी प्रदूषण होत आहे. ही जबाबदारी अधिकारी स्वीकारायला तयार नाहीत. इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी चिखलीतील रामझरा उगम ते संगम बफर झोन मार्क करून घ्यावा. बफर झोनमधील सर्व प्रकारचे भराव व अतिक्रमण हटवावे, अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नदी प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासन काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात कळवावी. अन्यथा, या विरोधात मनसे तसेच पर्यावरणप्रेमींच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, यासंदर्भात मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, शहर सचिव रुपेश पटेकर, शहर संघटक जयसिंग भाट, मनसे पिंपरी विधानसभा अध्यक्ष दत्ता देवतरासे यांनी याबाबत महापालिका आयुक्त तसेच, महापालिका पर्यावरण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.
इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीत होणारे प्रदूषण त्वरित थांबवावे. चिखलीतील रामझ-याचा उगम अधोरेखित करून त्याचे पावित्र्य राखले जावे. रामझऱ्यात उगमापासून ते चिखली-मोई फाट्याजवळ होणाऱ्या संगमाजवळ मिसळणारे सांडपाणी व रासायनिक सांडपाणी त्वरित बंद करण्यात यावे. राम झरा उगम ते संगम मार्क केलेल्या बफर झोनला दोन्ही बाजूस १० फूट जाळी बसवून घ्यावी. बफर झोनमधील जाळीच्या आतल्या भागात उपवृक्ष, झुडूप व गवत प्रकारातील झाडे लावावी. तसेच, एक छोटी पायवाट करावी.
राम झरा हा देखील नदी सुधार प्रकल्पाचा भाग असला पाहिजे. राम झऱ्याबाबत उगम व संगम दोन्ही ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावे. झऱ्याचे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व पर्यावरणशास्त्रीय महत्त्व बघता याबाबत शासकीय नोंदीची माहिती द्यावी. राम झरा उगम ते संगम स्वच्छ करण्यात यावा. मुळा, इंद्रायणी नदीपात्रात अनेक ठिकाणी मैलामिश्रित पाणी मिसळत आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी सावळे यांनी केली आहे.