नवी दिल्ली – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजने कोविड १९ मुळे मरण पावलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटलं की, मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना पुढील पाच वर्षांसाठी पूर्ण पगार देण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त रिलायन्स कंपनीने मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा ग्रॅज्युएट होईपर्यंतच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी म्हटलं की, रिलायन्स एक कुटुंबाप्रमाणे असून दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कायम कटिबद्ध आहे.
रिलायन्सच्या वतीने कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. मात्र तुम्ही एकटे नाही. संपूर्ण रिलायन्स संस्था तुमच्यासोबत आहे आणि कायम सोबत राहिल.
कंपनीने म्हटलं की, मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांचं ग्रॅज्युएटपर्यंतच शिक्षण, शैक्षणिक फीस, हॉस्टेल खर्च आणि पुस्तकांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच मृत कर्मचाऱ्याच्या पती/पत्नी, आई-वडील आणि मुलांच्या आरोग्य विम्याची १०० टक्के रक्कम देईल.
रिलायन्सने ऑफ रोल कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी देखील मदतीची घोषणा केली आहे. मृत ऑफरोल कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १० लाख रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पुढील काळात चांगले दिवस येतील, असा आशावाद रिलायन्सच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.