पणजी : ‘हाऊ इज द जोश…’ हे शब्द हिंदी चित्रपट रसिकांच्या मनांवर नुकतेच कोरले गेले. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील हा संवाद लोकांच्या मनात अजूनही तरंग निर्माण करत असून आता अनेक प्रसंगी लोकांनी हा संवाद वापरायला सुरुवात केली आहे.
उरी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी जेव्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी इफ्फीमधल्या माध्यम केंद्रात उपस्थित असलेले पत्रकार आणि प्रतिनिधी यांच्यासाठी तो ‘हाऊ इज द जोश..’ असा क्षण होता.
उरी चित्रपटाच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेले प्रसंग सांगतांना आदित्य धर म्हणाले की, मी एका चित्रपटावर काम करत असताना उरी हल्ला घडला आणि पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जायला सांगण्यात आले.
ही समस्या एक उत्तम कथा मांडण्याकरता माझ्यासाठी एक संधी ठरली, असे त्यांनी स्पष्ट केले. हा चित्रपट भारतीय सैन्य दल आणि त्यांच्या कुटुंबियांना आदरांजली म्हणून निर्मित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘हाऊ इज द जोश…’ या अतिशय लोकप्रिय झालेल्या संवादाबद्दल बोलतांना धर म्हणाले की, हा संवाद पटकथेचा हिस्सा होता पण सुरुवातीला हे वाक्य उच्चारणं विकी कौशलला फारसं रुचत नव्हतं पण सैनिकांना यामुळे प्रेरणा मिळते हे मी त्याला पटवून दिले. त्याने हे वाक्य जेव्हा उच्चारले तेव्हा तो तसेच आजूबाजूच्या सर्वांच्या अंगावर शहारे आले आणि त्यामुळेच आम्ही हा संवाद चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला.
उरी हा प्रचारपट असल्याच्या टिकेला उत्तर देताना आदित्य धर म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर ज्या घटना घडल्या त्या क्रमवारीने दाखवून खरेपणा दर्शवला आहे. या प्रक्रियेत सरकारचे तसेच इतर तांत्रिक पथकांचे योगदान दृष्टीआड करता येणार नाही, असे ते म्हणाले.
समाजातल्या काही भागाला हा प्रचारपट असल्याचे वाटत असेल तर मी याबद्दल काहीच करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकी कौशल सुपर हिरोची भूमिका करत असणाऱ्या ‘अश्वत्थामा’ या आगामी चित्रपटाबद्दलही त्यांनी माहिती दिली.