नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनावप्रकरणात गुजरातमधील कोर्टाने सुनावलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेच्याा निर्णयाला सुप्रीम कोर्टाने आज स्थिगिती दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,”देशातील हुकूमशाही शक्तींच्या पुढे काँग्रेस झुकली नाही व झुकणारही नाही. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक होय. राहुल गांधींना दिलासा म्हणजे, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की जीत’असं देखील त्यांंनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुलजी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुलजी गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक आहे.
विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे मागील ९ वर्षापासून देश पहात आहे. राहुल गांधी हे सातत्याने केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारत होते. राहुलजी यांच्यामुळे मोदी सरकारची कोंडी होत होती. संसदतेच राहुल गांधी यांनी मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीची चिरफाड केली होती. यातूनच राहुलजी यांच्याविरोधात भाजपाने षडयंत्र रचले व न्यायालयाच्या माध्यमातून त्यांची खासदारी रद्द करण्यात आली व शिक्षा सुनावताच अवघ्या २४ तासात त्यांना सरकारी निवासस्थानही सोडण्यास सांगितले होते. यामागे भाजपाचा हात आहे हे उघड दिसत होते.
राहुल गांधींना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी भाजपाने ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाज कष्टकरी व स्वाभिमानी आहे. निरव मोदी, ललित मोदी जनतेचा पैसा लूटून परदेशात पळून गेले, त्यांच्यावर भाजपाने कारवाई केली नाही उलट मोदी आडनावावरून ओबीसी समाजालाच चोर ठरवण्याचा भाजपाचा डाव होता. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने मात्र भाजपाचा हा डाव हाणून पाडला गेला, असं देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की,भाजपा खासदारांवर बलात्कार, खूनासारखे गंभीर गुन्हे असतानाही त्यांच्यावर कारावई केली जात नाही मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांवर तात्काळ कारवाई केली जाते. कर्नाटकातील एका प्रचार सभेतील विधानाचा आधार घेत गुजरातच्या सुरत न्यायालयात तक्रार दाखल केली जाते. व राहुल गांधी यांची खासदारी रद्द होती हा घटनाक्रम भाजपाचे राहुलजी गांधी यांच्याविरोधातील षडयंत्र उघड करण्यास पुरेशी आहे. मोदी सरकारला देशातभरात थेट भिडणारा नेता राहुल गांधी हेच आहेत म्हणून त्यांना राजकारणातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयाने या हुकूमशाहीवृत्तीला चपराक लगावली आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष व राहुलजी गांधी देशातील हुकूमशाही वृत्तीविरोधात लढत राहील.असं त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचा आनंद काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर व्यक्त केला. तसेच राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटत जल्लोष केला.