पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गोड हापूस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत आंब्याचा हंगाम काहीसा लवकर सुरू झाला आहे. उत्पादनही चांगले आहे, त्यातच तुलनेने काहीसे भावही कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सद्य:स्थितीत रत्नागिरी हापूसची आवक दोन ते तीन हजार पेट्याइतकी दररोज होत आहे़.
यामध्ये येत्या दोन -तीन दिवसांपासून आंब्याची आवक आणखी वाढेल. १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटकाही आंब्याला बसला आहे. सद्य:स्थितीत दर्जानुसार ४ ते ८ डझनाच्या पेटीला ३ ते ७ हजार रुपये इतका दर मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या आंब्याची आवक वाढत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोकणात आंब्याला हवामान पोषक असल्याने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर अरब देशातून चांगली मागणी आहे़. स्थानिक बाजारपेठेतूनही मागणी वाढली आहे.
दरवर्षी सारखाच आंब्याचा हंगाम राहील़. मार्च ते मे महिन्यापर्यंत हंगाम जोरात सुरू राहील, असे चित्र आहे. मात्र, एप्रिल महिन्यात काही प्रमाणात आवक कमी पडेल. बाजारात् मालाचा तुटवडा जाणवेल. सध्या, तयार मालाला ८०० ते १५०० रुपये डझन भाव मिळत अहे. यामध्ये आणखी घट होणार आहे. – युवराज काची, रत्नागिरी हापूसचे व्यापारी