मुंबई : महिला स्वयंपूर्ण झाल्या तर राज्याची जलद गतीने उन्नती होण्यास मदत होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात एमएसआरएलएमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, अवर सचिव माळी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत असणाऱ्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचवा. त्याविषयी महिलांना माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे कार्यक्रम घेऊन त्यांना योजनेविषयी जागृत करण्याच्या सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यक्रम घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.