देहूगाव – जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आषाढी वारी 337 वा पालखी सोहळा सुरक्षित पार पडावा तसेच भाविक वारकऱ्यांच्या सोयी सुविधाच्या पार्श्वभूमीवर नियोजन आढावा बैठक हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.17) भक्तनिवास येथे पार पडली. या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या नियोजनाची माहिती देण्यात आली.
या बैठकीला हवेलीच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण,उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, देहूरोड विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले व देहू संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले की, मुख्यमंदिर, वैकुंठ गमनमंदिर व गाथामंदिर अशा तीन ठिकाणी तर पीएचसीमध्ये बाह्यरुग्ण केंद्र असणार असून या केंद्रांवर कोवीड तपासणी (रॅपिड टेस्ट) ची सुविधा करण्यात आली आहे. तर देहूत असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या बेडची संख्या अहवाल प्राप्त करून वारकरी भाविकांसाठी राखीव बेड ठेवण्याच्या सूचना प्रांत असवले यांनी यावेळी दिले. करोना संपलेला नाही नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले.
शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी क्लोरीन आलमची उपलब्धता करण्यात आली आहे. 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाचे अक्षय रोकडे यांनी दिली. इनामदारवाड्यात पालखी मुक्कामानंतर मार्गस्थ होताना गर्दी होत असल्याने बॅरेकेट व दोरखंड लावण्याचे तर दानशूर व्यक्तींनी तसेच अन्नदान मंडळाकडून मास्क सॅनिटायझर वारकऱ्यांना उपलब्ध करण्याचे आवाहन डॉ. विवेक मोरे यांनी केले .अनगडशहा दर्ग्या जवळ सोहळ्यातील पहिली आरती ठिकाणी गर्दी होत असल्याने दर्ग्याजवळची भिंत काढण्याची मागणी संस्थानचे माजी विश्वस्त विश्वजीत मोरे यांनी केली.
पालखी सोहळा मार्गावर स्वागत कमानी उभारण्याचे तर भक्तीमय वातावरणसाठी भजनी मंडळाकडून अभंग व भक्तिगीते ध्वनी प्रदूषण न करता लावण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी केले. निर्मलवारीसाठी देहू- पंढरपूर तसेच आळंदी -पंढरपूर जनजागृती ध्वनी वाहनाद्वारे करण्याची मागणी अजित काळोखे यांनी केली.
पालखी प्रस्थानापुर्वी रविवारपासून (दि.19) मंगळवार (दि.21) पर्यंत देहूत प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. तसेच मंगळवारी (दि.21) देहू – देहूरोड दरम्यानचा मार्ग सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असणार आहे. रस्त्यावर व रस्त्यांच्या दुतर्फा साईड पट्ट्यांवर वाहने उभी केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये पोलिसांच्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना वाहतूक नियंत्रक तळवडे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केल्या. तर साध्या गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांसह सुमारे 700 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
महावितरणच्या नियोजनाबाबत तक्रार
महावितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली कार्तिकी,बीज, पालखी च्या सोहळ्याच्या तर सणांच्या ऐनवेळी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. खंडित विद्युत पुरवठा तासन्तास असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करता येत नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी अशी मागणी माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे यांनी केली. महावितरणचे अधिकारी यावेळी अनुपस्थित होते.