गुडगाव – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी उत्तर प्रदेशने महाराष्ट्राचा 6 गडी राखून निर्णायक पराभव केला. या सामन्यात विजयासाठी दुसऱ्या डावात साडेतीनशेपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या उत्तर प्रदेशने कर्ण शर्मा व अल्मास शौकत यांच्या दमदार शतकी खेळींच्या जोरावर एक अविश्वसनीय वाटणारा विजय साकार केला.
महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावात 462 धावा केल्या होत्या. त्यात कर्णधार अंकित बावणे व अझीम काझी यांची शतके होती. उत्तर प्रदेशचा पहिला डाव 317 धावांवर संपला होता. त्यात प्रियम गर्गने दीडशतकी खेळी केली होती. मात्र, सत्यजीत बच्छावने 7 गडी बाद करत महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली होती.
महाराष्ट्राने आपला दुसरा डाव राहुल त्रिपाठीच्या शतकी खेळीच्या जोरावर 5 बाद 211 धावांवर घोषित करत उत्तर प्रदेशसमोर विजयासाठी 357 धावा करण्याचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशच्या कर्ण शर्मा (116) तर अल्मास शौकत (100) यांनी दमदार शतकी खेळी केली.
तळात रिंकू सिंगने नाबाद 78 धावांची खेळी करत महाराष्ट्राच्या हातून विजय खेचून आणला. त्यांनी 4 गडी गमावून 359 धावा करत निर्णायक विजय प्राप्त केला व बाद फेरीतील आव्हान कायम राखले.