बेंगळुरु – यशस्वी जयस्वालचे शतक, हार्दीक तामोरेचे नाबाद अर्धशतक व सर्फराज खान व सुवेद पारकरने केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबईने मंगळवारी सुरु झालेल्या रणदजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात 87 षटकांत 5 बाद 260 अशी भक्कम मजल मारली.
उत्तर प्रदेशचा कर्णधार कर्ण शर्माने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. कर्ण शर्मा व यश दयाळने मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ, अरमान जाफर यांना तंबूचा रस्ता दाखवत थाटात सुरुवात केली. त्यावेळी एकाबाजूने जयस्वाल जबाबदारीने फलंदाजी करत होता. त्याने सुवेद पारकर 32 व सर्फराज खान 40 यांच्यासह छोट्या परंतू महत्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरताना संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. दरम्यान जयस्वालने अर्धशतक पूर्ण केले व संयमी फलंदाजी करत धावाही वाढवल्या.
तामोरेने जयस्वालला सुरेख साथ देत संघाचे द्विशतक पूर्ण केले. जयस्वालने आपले संयमी शतक साकार केले मात्र, त्यानंतर तो लगेचच परतला. त्याने या खेळीत तब्बल 227 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार फकावले व 100 धावा केल्या. तामोरेने जयस्वाल बाद झाल्यावर शम्स मुलाणीला साथिला घेत संघाला अडीचशे धावंचा पल्ला पार करुन दिली. त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तामोरे 74 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावत 51 धावांवर तर, मुलाणी 10 धावांवर खेळत आहे. उत्तर प्रदेशकडून यश दयाळ व कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
मंत्रीच्या नाबाद शतकाने मध्य प्रदेश सुस्थितीत
या स्पर्धेत पहिल्या उपांत्य लढतीत हिमांशु मंत्री याने फटकावलेल्या दमदार शतकाच्या जोरावर मध्य प्रदेशने बंगालविरुद्ध आपल्या पहिल्या डावात मंगळवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 86 षटकांत 6 बाद 271 अशी आश्वासक मजल मारली होती. प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर मंत्रीने नाबाद 134 धावांची खेळी करत संघाचा डाव एकहाती सावरला. त्याला अक्षत रघुवंशीने 63 धावांची खेळी करत सुरेख साथ केली. खेळ थांबला तेव्हा मंत्रीसह पुनित दाते 9 धावांवर नाबाद आहे. बंगालकडून मुकेश कुमार व आकाश दीप यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.