विशाखापट्टणम – यजमान भारतीय संघाने मंगळवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला. पाच टी-20 सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाने या सामन्यातील विजयासह मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे.
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या 23 असताना त्यांचा कर्णधार थेम्बा बवुमा बाद झाला. त्यानंतर रिझा हेंड्रीक्स व ड्वेन प्रीटोरियस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघे पाठोपाठ बाद झाल्याने त्यांचा डाव पुन्हा एकदा संकटात सापडला.
पहिल्या दोन्ही सामन्यांत अफलातून फलंदाज केलेल्या डेव्हीड मिलरने या सामन्यात साफ निराशा केली. संघाची धावसंख्या 71 असताना त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. रुसी वॅन दर दुसेनही अपयशी ठरला. यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल यांनी त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. दुसऱ्या सामन्यात वादळी फलंदाजी करणारा हेनरीच क्लासेन एका बाजूने भक्कमपणे फलंदाजी करत होता. तो आक्रमक फलंदाजी करण्याच्याच प्रयत्नात चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला व भारताला विजय खुणावू लागला.
क्लासेनने 24 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावत 29 धावांची खेळी केली. वेन पार्नेलने थोडीफार चमक दाखवली मात्र, भारताच्या गोलंदाजांनी त्याला आक्रमक फलंदाजी करु दिली नाही. या मालिकेत पहिल्यांदाच भारताची गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हानात्मक ठरली. पार्नेल 22 धावांवर नाबाद राहिला. केशव महाराजने 11 धावा केल्या मात्र, तो पर्यंत दक्षिण आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला होता. भारताकडून हर्षल पटेलने 4 तर यजुवेंद्र चहलने 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार व अक्सर पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार थेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत भारतालाच पुन्हा फलंदाजी दिली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या ऋतूराजने या सामन्यात मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी केली. त्याने इशानच्या साथित 97 धावांची भक्कम सलामी दिली. 35 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 57 धावांची अर्धशतकी खेळी केल्यावर ऋतूराज बाद झाला. त्यानंतर इशानने श्रेयस अय्यरसह संघाला शतकी मजल मारुन दिली.
अय्यर स्थिरावलेला असताना आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात 14 धावांवर परतला. दरम्यान इशाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले. मात्र, यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 35 चेंडूत 5 चौकार 2 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर खेळपट्टीवर आलेल्या कर्णधार ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले. तो केवळ 6 धावा काढून बाद झाला.
यानंतर हार्दीक पंड्याने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूत नाबाद 31 धावा करत संघाला 20 षटकांत 5 बाद 179 अशी समाधानकारक मजल मारुन दिली. अखेरच्या पाच षटकांत भारताने भरात असलेले फलंदाज गमावल्यामुळे द्विशतकी धावसंख्या उभारण्यात भारताला यश आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रीटोरियसने 2 गडी बाद केले. केशव महाराज, कागिसो रबाडा व तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 20 षटकांत 5 बाद 179 धावा. (ऋतूराज गायकवाड 57, इशान किशन 54, श्रेयस अय्यर 14, हार्दीक पंड्या नाबाद 31, अक्सर पटेल नाबाद 5, ड्वेन प्रीटोरियस 2-29, केशव महाराज 1-24, कागिसो रबाडा 1-31, तबरेज शम्सी 1-36).
दक्षिण आफ्रिका – 19.1 षटकांत सर्वबाद 131 धावा. (हेनरीच क्लासेन 29, रिझा हेंड्रीक्स 23, ड्वेन प्रीटोरियस 20, वेन पार्नेल नाबाद 22, हर्षल पटेल 4-25, यजुवेंद्र चहल 3-20, भुवनेश्वर कुमार 1-21, अक्सर पटेल 1-28).