नवी दिल्ली – बीसीसीआयने रणजी करंडक स्पर्धेतील बाद फेरीचे सामने दोन दिवसांनी पुढे ढकलले आहेत. आता उपांत्यपूर्व फेरी 6 जूनपासून सुरू होणार असून स्पर्धेची अंतिम लढत 22 जूनपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने सर्व राज्यांच्या क्रिकेट बोर्डांना परिपत्रक जारी करून उपांत्य फेरीचे सामने दोन दिवस उशिरा म्हणजे 12 जून ऐवजी 14 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाईल.
रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. आयपीएलच्या चालू हंगामापूर्वी रणजी ट्रॉफीचे साखळी सामने खेळवले गेले. तसेच बाद फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यामागे बीसीसीआयने अद्याप कोणतेही कारण दिलेले नाही.
रणजी ट्रॉफीच्या जुन्या वेळापत्रकानुसार बाद फेरीचे सामने 4 जूनपासून सुरू होणार होते. यापूर्वी बीसीसीआयने आयपीएल 2022 नंतर नॉकआऊट सामने खेळवले जातील असे सांगितले होते; परंतु तारीख देण्यात आली नव्हती. मात्र, आता नवीन वेळापत्रकानुसार बीसीसीआयने की सर्व सामने बायो बबलमध्ये असतील; परंतु खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय आरटीपीसीआर चाचणीत करोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर खेळाडू थेट त्यांच्या संघांशी संपर्क साधू शकतील. मात्र, मैदानावर प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.