कोयनानगर – गेल्या महिन्यात कोयना विभागातील हेळवाक येथे राहत्या घरात बिबट्या शिरल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी कोयना विभागातील शिरळ गावालगत असणाऱ्या शेतात गुरे चारायला गेलेल्या एका ७o वर्षीय वयोवृध्द शेतकऱ्यावर रानगव्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये शेतकरी जबर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला.
हरिबा सूर्यवंशी (वय ७०) शिरळ (कोयना, ता. पाटण) असे रानगव्याच्या हल्ल्यात जागीच ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
दरम्यान, वन्यप्राण्यांचे मानवी अतिक्रमण या गंभीर विषयाबाबत सगळीकडेच चर्चा होत असताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू हा गंभीर विषय बनला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि. ५ रोजी दुपारी कोयना विभागातील शिरळ येथे आपल्या गायरानात गुरे चरायला घेऊन गेलेले शेतकरी हरिबा सूर्यवंशी आपल्या घरी परत आले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी गायरानात शोधाशोध केली. यावेळी ते रानगव्याने केलेल्या हल्ल्यामुळे गायरानातच मृतावस्थेत पडल्याचे आढळले. यामुळे शिरळसह कोयना परिसरात एकच खळबळ उडाली असून रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी कोयना विभागातून वनविभागाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
मानव व रानगवा समोरासमोर आल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. यामध्ये वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकरी हरिबा सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार २o लाख रुपयांची मदत येत्या १५ दिवसांत देण्यात येणार आहे.
– महादेव मोहिते (उपवनसंरक्षक, सातारा)