करमाळा : आज (9 ऑगस्ट) महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील शेतकरी आणि ग्राहकांचा या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला.
रानभाज्यांच्या प्रदर्शनात आपले मत व्यक्त करताना तालुका पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती पै.मा.श्री.दत्तात्रय सरडे म्हणाले की, वर्षातून एकदाच ते पण विशेषतः पावसाळ्यात मिळणाऱ्या या रानभाज्या म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. विशिष्ट परिस्थितीत अनुकूल वातावरणात नैसर्गिकरीत्या येणाऱ्या या भाज्या आरोग्यदायी असून विविध जुनाट आजारांवर तथा दुर्धर आजारांवर रामबाण इलाज आहे. यातील विविध घटक आणि ॲन्टी ऑक्सीडंटस् मानवी शरीराला किफातशीर आहेत. त्यामुळे या भाज्यांच्या संवर्धनासाठी आपण अविरत प्रयत्न करून त्यांचा मूळ अधिवास जतन आणि संरक्षित करणे गरजेचे आहे.
या प्रदर्शनाला बहुसंख्य हौशी लोकांनी भेटी दिल्या व या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले. सदर रानभाजी महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती श्री. गहिनीनाथ ननवरे, उपसभापती श्री. दत्ताभाऊ सरडे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. गणेश चिवटे व करमाळा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती वीणा पवार मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवामध्ये प्रदर्शित केलेल्या रानभाज्यांचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे कृषि विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रानभाज्याची विक्री केली तर करमाळा शहर व परीसरातील ग्राहकांनी या रानभाज्या खरेदी करून उत्तम प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी श्री. सुरज पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अजयकुमार बागल यांनी मानले.