मुंबई – गेली २ वर्ष बंद असलेला दहीहंडी उत्सव यंदा कोरोना निर्बंध नसल्यामुळे जल्लोषात साजरा होणार आहे. यासाठी अनेक गोविंदा पथक कित्येक महिन्यांपासून तयारी करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी चिलखत योजना राबवली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील दहीहंडी पथकातील गोविंदांना यामध्ये विमा उतरवला जाणार आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यावेळी अनेक अपघात देखील घडतात. गोविंदा जखमी झाल्याच्या किंवा मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या प्रत्येक उत्सवानंतर येत असतात. मात्र यंदा मनसेने खबरदारीसह एक हजार गोविंदांचा १०० कोटींचा विमा मोफत उतरवण्याचा चंग बांधला आहे. या योजनेला मनसेकडून ‘चिलखत योजना’ असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेनुसार दहीहंडी फोडताना गोविंदाना अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबियांना 10 लाख रुपये, कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 10 लाख रुपये अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाख रुपये असं विमा सुरक्षा कवच मनसेच्यावतीने मिळणार आहे. तरी या योजनेचा नवी मुंबईतील गोविंदांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन मनसेचे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळेंच्या वतीने करण्यात आलं आहे.
गोविंदांना मनसेचे विमा सुरक्षा कवच …#मनसे #दहीहंडी pic.twitter.com/osqrvbljv3
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) August 5, 2022
मनसेच्या या उपक्रमाची महाराष्ट्रासह देशभर चर्चा आहे. दहीहंडी उत्सवाबाबतची खबरदारी प्रत्येक गोविंद घेत असतो मात्र तरीही अपघात होतात परंतु विमा कवच असेल तर गोविंदाला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा आधार निर्माण होणार आहे. मनसेच्या या उपक्रमामध्ये किती गोविंदा सहभागी होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.