नवी दिल्ली – सोमवार पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राजकीय पक्षांचे संसदेच्या दोन्ही सभागृहातील नेते या बैठकीला उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी अधिवेशनातील कार्यक्रम पत्रिका आणि चर्चेला घेतले जाणारे विषय याची माहिती उपस्थितांना करून देण्यात आली. संसदेचे हे अधिवेशन 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
अधिवेशनातील चर्चेच्या प्रस्तावात कशाला अग्रक्रम द्यावा या विषयीही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली मते मांडली. केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या व्यापक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी मंत्री म्हणून हे पहिलेच अधिवेशन असणार आहे.
सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितले. अधिवेशन सुरळीत आणि प्रॉडक्टीव्ह स्वरूपात चालावे यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.
विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या विषयांना सभागृहांच्या कामकाजात पुर्ण संधी दिली जाईल अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी यावेळी दिल्याचे जोशी यांनी सांगितले. आजच्या बैठकीला 33 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते असे त्यांनी सांगितले.