पुणे – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असणारी पावसाची संततधार शनिवारीही कायम होती. पावसाचा हा जोर आणखी दोन दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने सांगण्यात वर्तविला आहे.
गेल्या आठवड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. पण, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक संथगतीने सुरू होती. तर, काही ठिकाणची सिग्नल यंत्रणाही बंद होती. सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यातून वाट शोधताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.
दरम्यान, पानशेत खोऱ्यात जोरदार पावसामुळे नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. घेरा सिंहगड रांजणे खामगाव खोऱ्यातील आठ ते दहा गावांमधील ओढे, नाले, दुथडी भरुन वाहत असल्याने तेथील कधीही पाण्याखाली जाऊ शकतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाने भात खाचरे भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी भात लागवड झाली असून पिके बुडाली आहेत.