पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रारुप मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस पडला असून तीन दिवसांत 8 हजार 700 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने प्रारूप मतदार याद्या म्हणजे नुसताच घोळ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
प्रारूप मतदार यादीतील घोळ लक्षात घेऊन माजी नगरसेवक, इच्छुक, समाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी मुदतीत तब्बल 8 हजार 700 हरकती, आक्षेप नोंदविले आहेत. मतदार याद्यांमध्ये घोळाची परंपरा यंदाही कायम राहिल्याचे यातून दिसून आले आहे. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. प्रारूप मतदार याद्या तयार करताना काही त्रुटी राहिल्याचे सांगितले जाते. याद्या प्रसिद्ध करण्याच्या दिवशीच काही प्रभागातील याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचे उघडकीस आले होते.
त्यावर 1 जुलैपर्यंत हरकती आणि आक्षेप नोंदविण्यास मुदत होती. याद्यांमधील घोळाबाबत तक्रारी वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाने हरकत घेण्याची मुदत दोन दिवसांनी म्हणजेच 3 जुलैपर्यंत वाढविली. 3 जुलैपर्यंत 8 हजार 700 हरकती दाखल झाल्या आहेत. काही प्रभागात परिसर बदलला गेला आहे. काही प्रभागातील काही परिसर थेट दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केले गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसेच प्रारूप यादीत जिवंत व्यक्तींची नावे सापडत नाहीत, पण मृतांची नावे असल्याच्याही
तक्रारी आहेत.
तथ्यांची पाहणी होणार
निवडणूक विभागाचे कर्मचारी समक्ष जागेवर जावून हरकतीमध्ये तथ्य आहे का? याची पाहणी करणार आहेत. यासाठी 235 प्रगणक, 48 पर्यवेक्षक, 8 क्षेत्रीय अधिकारी आणि महापलिका मुख्यालयात 16 असे एकूण 307 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (दि. 9) अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले
6 लाखांची कमाई
प्रभाग याद्यांच्या 275 प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यातून 6 लाख 33 हजार 320 रूपयांचे उत्पन्न निवडणूक विभागाला मिळाले आहे, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.