मुंबई – मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन सकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे कामावर जाणाऱ्यांची चांगलीच धांदल उडताना पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसात मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. अशात पावसादरम्यान मृत्यू झालेल्यांची आकडेवारी समोर आली आहे.
मायानगरी मुंबईमध्ये तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी, विले पार्ले आणि विद्याविहारमध्ये सहा जणांचे निधन झाले आहे. तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक कोंडीही होत आहे. विद्याविहार आणि विले पार्ले येथे इमारतीचा भाग कोसळल्यामुळे दुर्घटना घडली होती. तर गोवंडीमध्ये मॅनहॉलमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
पावसामुळे कडाक्याच्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या पावसामुळे ट्राफिक सारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय. पुढील काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्यामुळे मुंबईकर खबरदारीसाठी सतर्क झाले आहेत.