डिकसळ – पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील भिगवण रेल्वे स्थानकावर गेल्या 50 वर्षांपासून थांबणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांचा थांबा येत्या 1 जुलैपासून रेल्वे विभागाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होण्याची भीती निर्माण झाल्याने रेल्वे प्रवासी कमालीचे संतप्त झाले आहेत. रद्द केलेल्या दोन्ही गाड्यांचा थांबा कायम ठेवण्याची तसेच नवीन गाड्यांचा थांबाही त्वरीत सुरू करावा, अशी मागणी विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपात रेल रोकोचा इशारा भिगवण रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष रामहरी चोपडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस, मुंबई-चैन्नई एक्सप्रेस या गाड्या नियोजित वेळेनुसर धावत असतात. या गाड्यांचा थांबा भिगवण रेल्वे स्टेशन येथे गेल्या 50 वर्षांपासून आहे. हे रेल्वे स्टेशन इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा व कर्जत या पाच तालुक्यांच्या आणि परिसरातील 40 ते 50 गावातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय तसेच खासगी नोकरदार, व्यावसायिक, उच्च शिक्षण घेणारे, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणारे, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील विविध शासकीय कामासाठी जाणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यांची मोठी सोय यामुळे झालेली आहे. असे असताना रेल्वे विभागाने 1 जुलै 2020 पासून या दोन्ही गाड्यांचा थांबा रद्द करण्याचा आदेश काढल्याने प्रवशांची मोठी गैरसोय तर होणार आहेच, शिवाय भिगवण व परिसराच्या विकासाला खिळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रद्द केलेल्या दोन्ही गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात यावा तसेच सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, मुंबई कन्याकुमारी एक्स्प्रेस या गाड्यांचा नवीन थांबा येथे देण्यात यावा, त्याचप्रमाणे दौंड शटल ही भिगवणपर्यंत सोडण्याबाबत गेल्या 15 वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, असे नमूद केले आहे.
दोन नवीन गाड्यांचा थांबा करण्यासंदर्भात 15 वर्षांपासून पाठपुरावा करत असताना रेल्वे प्रशासनाने मागण्यांचा विचार करण्याऐवजी याउलट दोन गाड्यांचा थांबा बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला असून, या मागण्या मान्य न केल्यास भिगवण स्टेशन येथे गामस्थ व प्रवाशांच्या वतीने तीव्र रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वे मंत्री अनंत कुमार, खासदार सुप्रिया सुळे, रेल्वे विभागाचे चेअरमन, महाप्रबंधक यांसह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आदींना पाठवण्यात आल्या आहे.