नवी दिल्ली – मोदी आडनाव’बाबत राहुल गांधींचे वक्तव्य अत्यंत अपमानास्पद होते, सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. देशाच्या पंतप्रधानांविषयी जी आक्षेपार्ह भाषा पक्षाचे माजी अध्यक्ष राहूल गांधी वापरतात, त्याचेच अनुकरण कॉंग्रेसचे इतर नेतेही करताना दिसून येते, अशा शब्दांत भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत साळवे बोलत होते. पंतप्रधानांविषयी अभद्र भाषा वापरणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यासाठी राहुल गांधींना गुन्हेगार मानावे की नाही, हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. पण पंतप्रधानांबात अतिशय अपमानास्पद बोलण्याची त्यांची नेहमीची पद्धत आहे. तुम्ही लोकांवर खोटे आरोप करत आहात; त्याबाबत कसलेही पुरावे तुम्ही देत नाही. तुम्ही न्यायालयातही जात नाही आणि नंतर म्हणत आहात की मी सार्वजनिक जीवनात आहे. पण रात्री झोपल्यावर त्यांना देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडते. मात्र, अगदी अशीच भाषा तुमच्याबद्दल कुणी वापरली, तर ते तुम्हाला सहन होऊ शकेल का?
साळवे यांनी सांगितले की, “जरी “मोदी आडनाव’ खटल्यातून राहूल गांधींना दिलासा मिळाला असला, तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितले की, तुम्ही जे बोललात ते चुकीचे आहे आणि असे बोलायला नको होते. पण दोषसिद्धीला स्थगिती देण्यात आली होती, कारण जोपर्यंत त्यांच्या अपीलवर (निर्णयाच्या विरोधात) निर्णय होत नाही तोपर्यंत, मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळणार नाही, म्हणूनच असे केले गेले.
केरळमधील वायनाडचे तत्कालीन लोकसभा खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लगेचच अपात्र ठरवण्यात आले. त्यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यात म्हटले होते की त्यांची टिप्पणी योग्य नाही, परंतु संसदेतून त्यांना अपात्र ठरविण्याचा परिणाम त्यांच्या मतदारांवर होईल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याचे (राहुल गांधी) विधान बरोबर नव्हते, यात शंकाच नाही. याचिकाकर्त्याने भाषण करताना अधिक काळजी घ्यायला हवी होती.
रेवडी वाटणे म्हणजे भ्रष्टाचारच!
रेवडी संस्कृती हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही करदात्यांच्या पैसा दोन्ही हातांनी उधळता. यापेक्षा वाईट राजकारण असूच शकत नाही. अनेक देशांमध्ये हे घडत आहे. युरोपमध्ये समाजवादाच्या नावाखाली जे काही चालले आहे, तिथली अर्थव्यवस्था डळमळीत आहे. उत्पादन खर्च वाढला आहे, कर्मचारी काम करत नाहीत, असेही साळवे म्हणाले.