मंगळुरू – केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी शुक्रवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाहीत. त्याविषयीचे राहुल यांचे स्वप्न कधीच साकार होणार नाही, असे त्या म्हणाल्या.
राहुल यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेने कर्नाटकमधील वातावरण ढवळून निघाले. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शोभा यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली. यात्रेतून केवळ राहुल यांची शारीरिक तंदुरूस्ती दिसली. पण, ते देशाचे नेतृत्व करू शकतात का? देशाचा कारभार पाहण्यासाठी आवश्यक मानसिक तंदुरूस्ती राहुल यांच्यात आहे की नाही ते देशाची जनता ठरवेल, असे त्या म्हणाल्या.
हिमाचलमध्ये निवडणुक जाहीर होताच आला ‘हा’ सर्वे; पुन्हा भाजपचीच सत्ता येणार? https://t.co/bfrmYzYHxQ
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022
शोभा या कर्नाटकमधील भाजपच्या नेत्या आहेत. त्या माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून भाजप राहुल यांच्या यात्रेला फारसे महत्व देत नसल्याचे सूचित झाले. मात्र, पुढील वर्षी कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहुल यांच्या यात्रेचा प्रभाव जाणवेल, असा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे.