पोषक वातावरण मिळत असल्याने पीक दमदार येण्याची आशा
राजेगाव- दौंड तालुक्यातील राजेगाव, स्वामी चिंचोली, वाटलूज परिसरात थंडीची चाहूल लागली आहे. रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने गहू, हरभरा आदी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. खरिपातील पिके अवकाळी पावसाने भुईसपाट झाली असल्याने रब्बी हंगामातील पिके बळीराजासाठी तारणहार ठरणार असल्याने पेरणीला जोर आला आहे.
यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने पावसाळा लांबला, त्यामुळे खरिपाची पिके हातून गेली.अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यातून झालेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे यंदा शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरअवेल तसेच राजेगाव येथील भीमा नदीला मुबलक पाणी आहे. खरिपाची पिके काढून रब्बीसाठी ठेवलेल्या शेतांमध्ये पेरणीपूर्व मेहनत करून गहू, हरभरा आदींच्या पेरणीची लगब सुरू आहे.अनेक ठिकाणी पेरणी झालेल्या शेतात शेतकरी पाणी सोडत आहे. रब्बीचा हंगाम चांगला साधून खरिपाचे नुकसान भरून निघेल व काही तरी यातून मिळेल, अशी आशा बाळगून शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारीला लागले आहेत.