Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला आहे. येवल्यात गावबंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करत जरांगे यांनी भुजबळ यांना धारेवर धरलं आहे. “भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम असल्याचा’ इशारा देखीलजरांगे यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मराठा आरक्षणासाठीचे लागलेले होर्डिंग फाडण्यात आले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. होर्डिंग फाडल्याने काही होणार नाही. मात्र, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितले पाहिजे.
अंबडमध्ये ओबीसी सभा झाली, मात्र आम्ही एकही कुणाचं बॅनर फाडले नाही. होर्डिंग फाडल्याने आरक्षण घेण्यापासून लोकांना रोखता येणार आहे का?, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना थांबवला पाहिजे. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नाहीतर आमच्या नावाने खडे फोडू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही सांगतो. असा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
नाहीतर मराठा शांत करायला सक्षम…
याला (भुजबळ) दोन-तीन दिवसांत शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम आहेत. फडणवीस यांनी त्याला समज द्यावी, आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, मराठ्यांना आवाहन आहे, आरक्षणाची अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे सध्या शांत रहा, आम्हाला आरक्षण येऊ द्या मग पाहतो हा कुठे पळतो. आता होर्डिंग फाडल्याचे व्हडिओ काढून ठेवा. नंतर बघू हा एकाच गल्लीत आहे, असे जरांगे म्हणाले.