- 11 ते 12 नोव्हेंबरला सर्वाधिक प्रतिसाद
पिंपरी – अवघ्या काही दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे उद्योगनगरीतून कामगार दिवाळीनिमित्ताने आपल्या गावी जाण्यासाठी वल्लभनगर आगारात आरक्षित तिकीट निश्चित करण्यासाठी गर्दी होत आहे. आठवडयावर दिवाळी आली असल्याने सर्वांना गावाची ओढ लागते. मात्र, वेळेवर गावी जाण्यासाठी बस उपलब्ध होत नाहीत. यामुळे आधीच तिकीटाचे आरक्षण केले जात आहे.
यंदा करोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून टाळेबंदीने बरीचशी बंधने आली होते. मात्र, आता राज्य सरकारने टाळेबंदीच्या अटी टप्याटप्याने शिथील केल्या आहेत. नुकतीच विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शाळा आणि क्लासलाही सुटी जाहीर झाल्यानंतर नागरिक गावी जाण्याच्या योजना आखत आहे. त्यासाठी एसटीच्या आरक्षण केंद्र, तिकीट घरात नागरिक सकाळपासून रांग लावत आहेत. वल्लभनगर आगारातून दिवाळीसाठी 10 जादा बसेस तर, 42 दैनदिन फेऱ्या व 14 शिवशाही बसेस राज्यातील विविध मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर प्रतिसाद बघून आणखी फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
एक नोव्हेंबर पासून जादा बसेस आगारातून सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 11 ते 12 नोव्हेंबर ह्या दोन दिवस आरक्षित तिकीटासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. असाचा प्रतिसाद पुढील आठवडयापर्यंत राहिल्यास आणखी काही मार्गावर जादा एसटी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले. तर, 40 प्रवासी ग्रुप बुकींगसाठी आल्यास त्यांना राज्यात कुठेही बस उपलब्ध केली जाईल, असे वल्लभनगर स्थानकप्रमुख पल्लवी पाटील यांनी सांगीतले.