मनिला – पंचांनी मला एका गुणाचा दंड केला त्यामुळेच मला आशिया करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून वंचित राहावे लागले. मी एका गेममध्ये सर्व्हिस करताना जास्त वेळ घेतल्याचे कारण सांगत पंचांनी माझ्या प्रतिस्पर्धी खेळाडूला एक गुण बहाल केला व त्यामुळेच मला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला व अंतिम फेरी गाठता आली नाही, असे मत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने व्यक्त केले असून तीने यासाठी पंचांनाच जबाबदार धरले आहे.
या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सिंधूला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीविरुद्धच्या लढतीदरम्यान पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा मला फटका बसला आणि माझा अंतिम फेरीत खेळण्याचा हक्क हिरावून घेतला गेला, अशी टीकाही सिंधूने केली आहे.
उपांत्य फेरीत सिंधूला यामागुचीकडून 21-13, 19-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधू 14-11 अशी आघाडीवर होती. त्यावेळी सर्व्हिस करण्यासाठी तिने जास्त वेळ घेतल्याने पंचांनी प्रतिस्पर्धी यामागुचीला एक गुण बहाल केला.
यानंतर सिंधूने दुसरा गेम 19-21 असा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने गमावला. त्यानंतर तिसऱ्या गेममध्येही तिला पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे सिंधूला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.