हिंजवडी – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आता विकास सोसायट्यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचे इंद्रायणी वाणाचे भात खरेदी करण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून 24 रुपये प्रतिकिलो दराने भात खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून तांदळाची विक्री बॅंकेच्या विविध केद्रांमार्फत केली जाणार आहे. बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी घेतलेल्या या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे भात उत्पादकांना जागेवरच हमी भावाप्रमाणे मोबदला मिळणार असून, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.
मुळशीत विकास सोसायट्यांचे सचिव आणि बॅंक अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला.तालुक्यातील बळीराजा मोठ्या कष्टाने निसर्गाशी संघर्ष करून भाताचे उत्पादन घेतो. मात्र, केलेले कष्ट आणि झालेल्या खर्चाच्या तुलनेत भाताच्या विक्रीतून अपेक्षित मोबदला मिळत नव्हता. पीडीसीसी बॅंकेशी शेतकऱ्यांचे आर्थिक नाळ जोडली गेली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बॅंकेनेही आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. भात उत्पादनातून शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी इंद्रायणी वाणाचे भातच खरेदी करण्याचा अनोखा निर्णय बॅंक संचालक मंडळ व व्यवस्थापनाने घेतला.
विकास सोसायटीच्या माध्यमातून बॅंक भात खरेदी करणार आहे. शेतकऱ्याला प्रतिकिलो 24 रुपये दर दिला जाईल. तथापि भात खरेदीच्या वेळी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करणार असून भाताची गुणवत्ता पाहून त्याचा दर निश्चित होईल. भाताचे वजन घेतल्यानंतर जागेवरच शेतकऱ्याला मोबदल्याचा धनादेश दिला जाईल. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून तयार झालेला तांदूळ मुळशी ऍग्रो नावाने मार्केटमध्ये विक्री केला जाईल. त्यासाठी विविध ठिकाणी विक्री केंद्रेही उभारणार असल्याचे चांदेरे यांनी सांगितले.
तालुक्यातील विकास सोसायट्यांचे सचिव, बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांची पौडला बैठक झाली. या वेळी चांदेरे यांच्यासह कार्यलक्षी संचालक अंकुश उभे, महाराष्ट्र सहकार मंडळाचे प्रमुख डॉ. मिलिंद आकरे, विभागीय अधिकारी सुरेश नांगरे, वसुली अधिकारी राजेंद्र मारणे, पालक अधिकारी सुनील खताळ, मावळमधील निरज पवार उपस्थित होते. या वेळी डॉ. मिलिंद आकरे, नीरज पवार यांनी मार्गदर्शन केले. सचिव अतुल मेंगडे यांनी सूत्रसंचालन तर हनुमंत चोंधे यांनी आभार मानले.
सभासदांना मिळणार लाभांश
भात खरेदीतून मिळणाऱ्या नफ्यामुळे शेतकरी सभासदांना लाभांश मिळेल. त्यासाठी प्रत्येक सोसायटीला मागणीप्रमाणे कॅश क्रेडीट कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. शेतकऱ्यांनाही भाताचा योग्य दर मिळून त्यांना आर्थिक ताकद मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी विकास सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव, संचालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चांदेरे यांनी केले.