सोलापूर – करोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा 143 वा पुण्यतिथी सोहळा भाविकांविना अत्यंत शांत वातावरणात पार पडला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विविध धार्मिक कार्यक्रम यंदा गर्दी टाळण्याकरिता रद्द करण्यात आले होते.
करोनाच्या साथीमुळे लागू केलेल्या विविध निर्देशाचे पालन करीत मंदिर समितीने पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना स्वामींच्या दर्शनाकरीता मंदिर बंद ठेवले आहे. मंदिरातील नित्य पूजा व दिवसातील तीनही आरती चालू आहेत. या पार्श्वभूमीवर आज पहाटे 5 वाजता श्रींची पुण्यतिथी महोत्सवाची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यानंतर श्रींना लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. सकाळी 11:30 वाजता देवस्थानची नैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी 12 वाजता अक्कलकोट संस्थानच्यावतीने मालोजीराजे भोसले यांचे हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर सायंकाळी अक्कलकोट शहरातून प्रतिवर्षी संपन्न होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला होता. अशा प्रकारे यंदाही करोनाच्या सावटाखाली संपन्न झालेला श्री स्वामी समर्थांचा 143 व पुण्यतिथी महोत्सव या ही वर्षी कोणत्याही भाविकांच्या अनुपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने झाला.