पाथर्डी : स्थानिक नागरीकांना डावलून तालुक्याबाहेरील लोकांचे पाथर्डीत होणार्या लसीकरणावर तीव्र आक्षेप घेत भाजप युवा मोर्चाने पाथर्डीत लस बंद आंदोलन पुकारले. तालुक्याबाहेरील लोकांना पाथर्डीत लसीकरणास प्रतिबंध करावा, अशी मागणी करत संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांती लसीकरणच बंद पाडले होते.
उद्यापासून आधारकार्ड पाहूनच प्रवेश देऊन बाहेरच्या लोकांना माघारी पाठवू, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व मुकुंद गर्जे व अमोल गर्जे यांनी केले. लसीकरणाचा तीव्र गोंधळ सुरू असून, कोठेही लस मिळत नाही. जेवढा कोटा मंजूर होतो, त्याच्या कितीतरी अधिक पटीत लसीकरण करण्यासाठी गर्दी होते. 3 दिवसांपूर्वी तर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गर्दीमुळे सर्व नियम धाब्यावर बसवले जाऊन करोनाचा खरा प्रसार केंद्रावरून होतो, असा अनुभव लोकांना आला.
आज सकाळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते केंद्रावर आले. जोरात घोषणाबाजी करत केंद्रापुढे दारात बैठक मारली. काहींनी रांगेत उभे असणार्या लोकांचे आधार कार्ड तपासले. त्यामध्ये नगर, शेवगाव, श्रीरामपूर, नेवासा, बीड, नाशिक आदी गावांचे स्त्री-पुरुष आढळून आले. यापूर्वी पुणे, बारामती, औरंगाबाद, बीड, विभागातून लोकांची उपस्थिती केंद्रावर होती. बाहेरगावचे लोक चटकन लस घेऊन निघून जातात आणि स्थानिक नागरिक तासनतास रांगेत उभे राहून लस संपल्याचे व नोंदणी नसल्याचे उत्तर ऐकून निघून जातात यामुळे हे आंदोलन घडले.
यावेळी बोलताना मुकुंद गर्जे म्हणाले, ऑनलाइन नोंदणी काही सेकंदात पूर्ण होऊन कोणीही कुठूनही पाथर्डीचे केंद्र मोकळे दिसताच क्लिक करतात. गेल्या 3 दिवसांपासून अहोरात्र जागून काहीजण मोबाईलवर लाईन मोकळी सापडण्यासाठी प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार मॅनेज असून मोठी साखळी यामध्ये कार्यरत आहे. ग्रामीण भागातही ऑफलाइन पद्धतीचा सावळा गोंधळ सुरू असून लसीकरणाच्या माध्यमातून शासन- प्रशासनाकडून लोकांची भावनिक अडवणूक व मनमानी सुरू असल्याचा अनुभव येतो. शहरासाठी मंजूर कोटा ऑनलाइन दिसतो. प्रत्यक्षात बाहेरचे लोक लस लगेच घेऊन जातात मूळ पाथर्डीकर मात्र वंचित राहत आहेत.
तालुका ऊस तोडणी कामगाराचा व शेतमजुरांसह कष्टकरी वर्गाचा आहे. अनेकांकडे मोबाईल नाहीत, अनेकांना ती प्रक्रिया समजत नाही. सरसकट ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड पाहून लसीकरण करावे. त्यानंतर कर्मचार्यांनी ती माहिती संगणकात साठवून ठेवावी. लोकांची अडवणूक व दिशाभूल होत असेल तर कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. बाहेर तालुक्यातील लोक आम्ही आता पिटाळून लावू. तालुक्याबाहेरील कुणीही तालुक्याचे केंद्राचे नाव टाकू नये. आम्ही केंद्रात अशा लोकांना प्रवेश करू देणार नाही. शासनाने त्वरित बदल न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा अमोल गर्जे यांनी यावेळी दिला.
मार्ग काढण्याचे आश्वासन…!
नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी आंदोलकांशी संवाद साधून वरिष्ठाबरोबर बोलणे करून परिस्थिती निदर्शनास आणून देवू, असे आश्वासन दिले. काही वेळाने पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे फौजफाट्यासह आले व त्यांनीही माहिती जाणून घेत वरिष्ठ अधिकार्यांशी बोलू व मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.