चंदिगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील जनतेसाठी घरपोच रेशन योजना जाहीर केली आहे. आता गरिबांना लांब रांगांमध्ये उभे राहण्याची आवश्यकता असणार नाही. चांगल्या गुणवत्तेचे रेशन त्यांना घरपोच उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
ही योजना पात्र लाभार्थ्यांसाठी पर्यायी असणार आहे, असे मान यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल. या योजनेनुसार अधिकारी पात्र लाभार्थ्यांना फोन करतील आणि त्यांच्या सोयीप्रमाणे आणि उपलब्धतेनुसार रेशन घरपोच उपलब्ध करून दिले जाईल, असे मान यांनी म्हटले आहे.
केजरीवाल सरकारने ही योजना दिल्लीत सुरू केली आहे. मात्र, दुर्दैवाने ती थांबवायला लागली होती. पंजाबमध्ये मात्र या योजनेची अंमलबजावणी केली जाईल आणि आम्ही ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवूू. पंजाब सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली की अन्य राज्यांमध्येही या योजनेची मागणी व्हायला लागेल, असेही मान म्हणाले. दिल्लीत घरपोच रेशन योजनेमध्ये केंद्र सरकारने अडथळे आणल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.