पुणे -सकाळी हवेत गारवा, दुपारी कडक ऊन आणि पुन्हा रात्री गारवा या मिश्र वातावरणाने नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून, कोरडा खोकला, अंगदुखी आणि घसादुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वास्तविक दिवाळी जवळ आली की थंडीची चाहूल लागते; परंतु यावेळी लांबलेला पाऊस आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यामुळे थंडी उशिराने सुरू झाली. मध्येच ती पळाली आणि उन्हाळ्याप्रमाणे ऊन पडले. मात्र आता गेल्या आठवड्यापासून रात्री आणि पहाटे थंडी जाणवू लागली आहे. या सगळ्या मिश्र वातावरणामुळे नागरिकांमध्ये “ऍलर्जीटिक’ आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. या वातावरणात प्रदूषण वाढते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. हाच परिणाम आता घरटी एका व्यक्तीवर झालेला दिसून येतो.
कोरडा खोकला, ताप आणि त्यामुळे होणारी अंगदुखी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा खोकला बरा होण्यालाही किमान पंधरा दिवस लागत आहेत. ताप उतरला आणि अंगदुखी कमी झाली तरी खोकल्यामुळे छातीमध्ये दुखणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. याशिवाय ज्यांना कफ झाला आहे, त्यांचा कफ रात्री थंडी असल्यामुळे कमी होताना दिसत नाही.
या लक्षणांवर प्रतिजैविके (अँटीबायोटिक) घेऊ नये तर गरम पाणी प्यावे, गरम पाण्याने घशाला शेक बसेल अशा गुळण्या कराव्यात, हळद टाकून दूध प्यावे, फळे, सॅलड, हिरव्या पालेभाज्या आणि सकस आहारातून प्रतिकारशक्ती वाढवावी, असा सल्ला फॅमिली फिजीशियन डॉ. अधीर तांदळे यांनी दिला आहे.
मास्क वापराच
हवेत पसरणाऱ्या विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा सामना करायचा असेल तर मास्क वापरावाच. यामुळे काही प्रमाणात याचा प्रसार टाळला जाऊ शकतो. खोकल्याने आजारी असलेल्या व्यक्तीने शक्यतो कुटुंबात विलगीकरणात रहावे आणि गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.