बदलत्या निसर्ग चक्राचा आंब्याला फटका; पिकाचे मोठे नुकसान
नेहमीच्या तुलनेत केवळ 25 ते 30 टक्केच फळधारणा
मागणीच्या तुलनेत आवक कमी; हापूस महागणार
पुणे – मागील दोन वर्षे करोनामुळे आंब्याची आवक नेहमीच्या तुलनेत कमी झाली. यावर्षी बदलत्या निसर्ग चक्राचा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. पिकाचे मोठे नुकसान झाले असून, नेहमीच्या तुलनेत केवळ 25 ते 30 टक्केच फळधारणा झाली आहे.
गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वी बाजारात सुमारे चार ते पाच हजार पेटी आंब्याची आवक होत असत. मात्र, ती यावर्षी दीड ते दोन हजारापर्यंत आली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने यंदा हापूस महागच असणार आहे. आंबा प्रेमींना हापूसची चव चाखण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
भाव आवाक्यात येणाऱ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी युवराज काची यांनी दिली. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात मोजकीच आवक होत आहे.
त्यामुळे हापूसचे भाव आवाक्याबाहेर आहेत. सुमारे 15 एप्रिलनंतर हापूसची आवक वाढणार असल्याचा अंदाज आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतरच काही प्रमाणात भाव कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.
तोपर्यंत मात्र हापूसचे दर अधिकच असणार आहेत. प्रारंभीच्या काळात मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. तसेच त्यानंतर मोहराला आलेले फळही मोठ्या प्रमाणात गळाले आहेत. त्यामुळे यावेळी फळधारणा कमी असल्याने बाजारातील आवक लांबणीवर पडली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
यंदा चार ते पाचवेळा झाडांना मोहोर आला. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने मोहोर गळाला. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. मागील काही वर्षांपासून कोकणात मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच झाडावर आणि फळावर पडणाऱ्या वेगवेगळ्या रोगाचे प्रमाण वाढल्याने 10 ते 12 वेळा फवारणी करावी लागत आहे. औषधांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. त्यातच फळधारणा कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
– सुरेंद्र भटकर, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी
हापूस कच्चा
(3 ते 6 डझन पेटी)
3 ते 6 हजार रुपये
तयार मालाच्या
(3 ते 6 डझन पेटी)
3.5 ते 7 हजार रुपये