पुणे – बालभारती – पौड रस्ता विषयात पर्यावरणप्रेमींचा होणारा विरोध लक्षात घेऊन, या पर्यावरणप्रेमींना नेमका कोणाचा, कसला विकास करायचा आहे? नेमके कोणाचे हित साधायचे आहे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करत जनहित याचिका, रीट पिटिशन दाखल करून विकास थांबवणे यात नेमका हेतू काय? असा सवाल “नागरिक हक्क संस्थे’ने विचारला आहे. राज्य सरकारने हरकती-सूचना प्रसिद्धीला देऊन आराखडा रद्द करून पर्यावरण प्रेमी सांगतात त्याप्रमाणे तरी विकास करा, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
“नागरिक हक्क संस्थे’चे अध्यक्ष सुधीर (काका) कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. बालभारती-पौड रस्ता प्रकल्प मार्गी लागलाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. या सर्व गोष्टी करदाते नागरिक यांच्याशी चर्चा न करता अचानक पर्यावरण प्रेम आणि नैसर्गिक जलस्रोत बंद झाले वगैरे ओरड करणे चुकीचे आहे, असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. पूल बांधायचे आणि मग ते तोडायचे, विकास आराखड्यातील रस्ता उखडून टाकायचा नंतर बांधायचा, यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न तर सुटत नाहीच; परंतु अपघातांची संख्यादेखील वाढते. या सगळ्यात पुणेकरांचा श्वास गुदमरतो आहे, असे कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांचा आधार घेऊन पर्यावरणाच्या नावाखाली टाहो फोडणे याला नेमका कोणाचा पाठिंबा आहे, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. राजकीय आकसापोटी विरोध करणे, खरेच या विरोधातून पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे का, यातून पुणे हे गतीमान विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे का, हे पाहण्याची गरज असल्याचे, कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
नदी सुधार योजनेलाही या पद्धतीने विरोध करणे, जायका प्रकल्पासाठी विलंब करणे हे नेमके कोणासाठी केले जात आहे, केवळ मूठभर लोकांसाठी केले जात आहे का, एकात्मिक विकास आराखडा मंजुरीवेळी हे पर्यावरणप्रेमी कोठे गेले होते? असा प्रश्नही कुलकर्णी यांनी विचारला आहे. त्यामुळे चांदणी चौक रस्ता, समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प, विकास आराखड्यातील सर्व रस्ते, विकसन करताना या पर्यावरणाचा विचार करूनच आराखडा बनवला असल्याने त्यावर ठोस पावले उचलावीत, अशी विनंती कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांना केली आहे.