पुणे – न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाकडून राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचवेळी पावसाळ्यात निवडणुका घेता येणे शक्य नसल्याची भूमिका निवडणूक आयोग न्यायालयात घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, निवडणूक सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये होणार असतील तर प्रभागरचना जाहीर करण्याची घाई का, असा सवाल माजी विरोधीपक्ष नेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महापालिका गुरुवारी अंतिम प्रभागरचना आयोगास सादर करणार असून आयोग त्याला मान्यता देऊन ही प्रभागरचना पुन्हा महापालिकेस पाठविणार आहे. त्यानंतर, महापालिकेने प्रभागरचनेच्या नकाशांची प्रिंट काढून तसेच त्यांचे गॅझेट जाहीर करून ही प्रभागरचना 17 मेपर्यंत फलक तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करायची आहे. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात होईल. मात्र, त्याचवेळी निवडणुका मात्र दोन ते तीन महिने पुढे जातील असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे, जर निवडणुका उशीरा होणार असतील, तर आयोगाकडून प्रभागरचना जाहीर करण्याची घाई का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.