उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती
पुणे – अधिवेशनापूर्वी खूप काही बोललं जात होतं. महाविकास आघाडी सरकार पडणार म्हणून अनेकांनी तारखाही जाहीर केल्या. मात्र, हे आपण गेले अडीच वर्षे पाहत आलेलो आहोत. मी आज पुन्हाएकदा सांगतो की जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी या तिघांनी ठरवलेले आहे, तोपर्यंत हे सरकार भक्कमपणे चालेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
पुणे पोलीस कल्याण निधीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनतेला खूप काही देण्याचा प्रयत्न केला. एकूण 17 विधेयक मंजूर करून घेतली. समाजाच्या सर्व घटकांना कसा न्याय देता येईल, याबाबत अधिवेशनात प्रयत्न झाला. शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांसह सर्व घटकांना कशी मदत करता येईल, यावर आम्ही काम करत आहोत. मला विकासाबद्दल विचारा, लोकांना विकास हवा आहे. त्यामुळे हा काय म्हणाला आणि तो काय बोलला, यासाठी मला वेळ नाही.’
प्रकल्प स्थलांतरणाचा आरोप खोटा
जुन्नरचा बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला नेल्याचा आरोप धादांत खोटा आहे. या प्रकरणात काही लोकांकडून राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोललो आहे. वनविभागाचा कार्यभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून त्यावर चर्चा केली आहे. वनविभागाकडून जुन्नरमध्ये सर्व्हे करून बिबट्या सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
…आता सचिन वाझे झाला म्हणतात
अँटेलिया प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे सध्या कारागृहात आहेत. या प्रकरणात तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. याच सचिन वाझेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “याआधी गावखेड्यांत काही झाले तर बोर्फोस झाला म्हणालचे. आता मात्र याचा सचिन वाझे झाला म्हणतात’
————–
इंधनाचे दर आणखी वाढणार
इंधनदर आणखी वाढणार आहेत. त्याचे कारण युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जागतिक पातळीवरच इंधनाच्या किंमती वाढत आहेत. म्हणूनच अर्थसंकल्पात घरगुती गॅस आणि सीएनजीवरील हजार कोटी रुपयांचा टॅक्स माफ केलेला आहे, असे पवार म्हणाले.