पुणे – शहर आणि ग्रामीण भागातील करोनाचा संसर्गदर आणखी दोन दिवस तपासून सोमवारपासून पुणे “अनलॉक’ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील संसर्गदर कमी असून, येथे आणखी शिथिलता देण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हा भाग महापालिका हद्दीत असल्याप्रमाणे सवलतींसाठी धरण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्यामुळे महापालिकेचे निर्बंध तेथे लागू होतील, असे स्पष्ट झाले.
विधानभवन येथे जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, शहरात करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने निर्बंधांमध्ये आणखी सवलती देण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ब्यूटी पार्लर, सलूनची दुकाने उघडण्याची मागणी होत आहे. याबाबतहीसुद्धा सोमवारी निर्णय घेण्यात येईल.
प्रत्येक दिवशीचा शहर आणि जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर विचारात घेऊन कोणत्या सवलती द्यायच्या, याचा निर्णय घेतला जाईल. देहू कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये बाधितसंख्या जास्त असल्याने तेथे ग्रामीण भागाचे नियम लागू असतील.
वॉर्ड रचनेचा निर्णय लवकरच
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, निवडणुका घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. प्रभाग रचनेमध्ये एकच वार्ड असावा की, दोन सदस्यांचा असावा याबाबतचा अधिकार राज्य सरकारला आहे. पुण्यासह अन्य शहरांमध्ये एक सदस्य, दोन सदस्य, तीन सदस्य की चार सदस्यांचा वार्ड करायचा याचा निर्णय तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील.
वारीसाठी समिती स्थापन
आषाढी वारी संदर्भात आज पुन्हा वारकरी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. कुंभमेळा भरल्यानंतर तेथे करोनाबाधितांची संख्या वाढली. या सर्व पार्श्वभूमीवर पायी वारीसाठी कमीत कमी 50 वारकरी यांना परवानगी दिली तरी पादुकांच्या दर्शनासाठी पालखी मार्गावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश असून, विभागीय आयुक्त यांना हा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले आहे, असे पवार यांनी सांगितले.
“अनलॉकच्या वादावर पडदा
श्रीवर्धन -“अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असते. मात्र, अनलॉक करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे,’ असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन उठवण्यावरून गुरुवारी निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
खेडमध्ये मनोमिलन घडवू
खेड तालुक्यात सभापती निवडीवरून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला आहे. याविषयी विचारले असता पवार म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीनही एकविचाराने काम करत आहेत. वरिष्ठ पातळीवर तीनही पक्षांमध्ये समन्वय आहे. मात्र, हा समन्वय स्थानिक पातळीवर रुजण्यास वेळ लागेल. याबाबत तालुका पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणू, असे एका प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे – बाधित दर 5%
पुणे – शहरातील नवीन करोनाबाधितांचा दर 6.11 टक्क्यांवर आला आहे, तर मागील दोन दिवसांपासून हा दर 5 टक्क्यांवर आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने शहर अनलॉक करण्यासाठी जाहीर केलेल्या नवीन निकषांमध्ये पुणे शहर पहिल्याच टप्प्यात अनलॉक होण्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
शहरात मार्च आणि एप्रिल महिन्यांत करोनाच्या साथीने थैमान घातले होते. त्यामुळे शहरातील दैनंदिन बाधितांचा दर दररोजच्या चाचण्यांच्या तुलनेत 27 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, त्यानंतर शहरात लॉकडाऊन जाहीर करत करोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
परिणामी 18 एप्रिलपासून शहरातील बाधितांचा दर कमी होण्यास सुरुवात झाली. 23 ते 29 एप्रिल या कालावधीत हा दर 25 टक्केहोता. त्यानंतर 30 एप्रिल ते 6 मे या कालावधीत हा दर 19.77 टक्क्यांपर्यंत खाली आला, तर 7 ते 13 मे या कालावधीत तो 15.6 टक्के, 14 ते 20 मे
या कालावधीत 10.91 टक्के, 21 ते 27 मे या कालावधीत 7.80 टक्के तर 28 मे ते 3 जून या कालावधीत हा दर 6.11 टक्के झाला आहे, तर हा बाधितांचा दर 4 जून रोजी पाच टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे शहरासाठी ही सकारात्मक बाब असून, शहरातील साथ लक्षणीय प्रमाणात ओसरली असल्याने राज्याच्या नवीन निकषांनुसार शहर अनलॉक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.